संतोष पवार
मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत; पारदर्शक कारभाराबरोबर नागरिकांना जलद सुविधा देण्यावर भर
सातारा – जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा कारभार पारदर्शक करण्याबरोबरच नागरिकांना जलद सुविधा देण्यावर आपला भर राहणार आहे. ग्रामसेवकांचे दप्तर अपडेट ठेवण्यासाठी 16 पानी तपासणी नमुन्याची अंमलबजावणी करण्यात येत असून स्वच्छ, सुंदर, निर्मल, हागणदारीमुक्त सातारा जिल्हा हा नावलौकिक कायम राखण्यासाठी आगामी काळात प्लॅस्टिक मुक्तीसाठीही सातारा जिल्हा परिषद अग्रेसर राहणार आहे, असा संकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्त केला.सातारा जिल्हा परिषदेने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेचा नावलौकिक देशभर पोहोचला आहे. विशेषत: स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त ग्राम अभियान, निर्मल ग्राममुळे सातारा जिल्हा परिषदेची देशभर ओळख झाली आहे.
सातारा जिल्हा परिषदेने आता प्लॅस्टिकमुक्तीसाठी पुढाकार घेतला असून त्यानुसार पंचायत समिती, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत आहे. विविध सामाजिक संस्थांचाही या उपक्रमात सहभाग गरजेचा असून त्यादृष्टीने अनेक संस्था पुढे येताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकारी, सदस्य, अधिकारी याबरोबरच निवृत्त अधिकाऱ्यांनाही यामध्ये सहभागी करुन घेणार असल्याचे भागवत यांनी सांगितले.
जिल्ह्यात निर्मल ग्राम, हागणदारीमुक्त गाव योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली असली तरी ऊस तोड कामगार उघड्यावर शौचास जात असतात. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. याबाबत संबधित साखर कारखाना व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करुन त्यांना तात्पुरती शौचालये उभारण्यास प्रवृत्त करणार आहे. फिरस्ते, पारधी समाजातील नागरिकांसाठीही कायमस्वरुपी अथवा तात्पुरती शौचालये उपलब्ध करुन देण्याचा मानस संजय भागवत यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांचा कारभार स्वच्छ व पारदर्शक करण्यावर आपला भर आहे. शासनाच्या योजनांची प्रभावीपणे करुन त्या योजनांचा तळागाळातील लोकांना लाभ होण्यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे. जिल्हा परिषदेने जैवविविधता ऍप तयार करुन राज्यात आघाडी घेतली आहे. या ऍपवर माहिती अपलोड करुन डिजीटल रजिस्टर स्वरुपात त्याच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर दोन कोपऱ्यात फाईव्ह स्टार शौचालय, बाथरुम उभारण्याचा संकल्प आहे. नागरिकांकडून नाममात्र शुल्क आकारुन ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचे संजय भागवत यांनी सांगितले.
रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. परिणामी जलद कामे होत नाहीत. विविध विभागांत सुमारे 708 रिक्त पदे असून ती लवकरात लवकर भरण्याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या पदांची भरती झाल्यास जिल्हा परिषद प्रशासन अजून गतीने लोकांना सेवा देऊ शकेल, असा विश्वास संजय भागवत यांनी व्यक्त केला.
ग्रामसेवक दप्तरांची अंमलबजावणी
दिवसेंदिवस ग्रामपंचायतींचे अधिकार वाढत असून ग्रामसभांना अधिकार देण्यात आले आहेत. ग्रामसेवकांनी दररोज वेळेत नेमणुकीच्या ठिकाणी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यावर भर देण्याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. ग्रामसेवकांचे दप्तर अपडेट राहावे यासाठी 16 पानी नमुन्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींमध्ये होणारे अपहार, गैरव्यवहार यांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
नेमणुकीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मुक्कामावर भर
जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामास राहावे, असा शासन निर्णय आहे. मात्र, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. संबंधित कर्मचारी ज्या- त्या गावात मुक्कामास राहिले तर त्यांची गावाशी ऍटॅचमेंट वाढून गावाच्या विकासातच भर पडणार आहे. ग्रामपंचायतींनी याबाबत पुढाकार घेवून शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन भागवत यांनी केले.