पाबळ -सध्या राज्यासह देशभरात महिला, मुलींच्या बाबतीत अनेक विपरीत घटना घडत असतात. त्यामध्ये अनेकदा अल्पवयीन मुले असल्याचे समोर येत आहे. तसेच पालक, मुलांमधील संवाद कमी झाल्याचे दिसून येत आहे. मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. संस्कार क्षमता कमी झालेली आहे. इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटलेली तरूणाई अनेकदा दिसून येत आहे. परंतु हे सर्व कुठेतरी थांबणे गरजेचे आहे.
पुणे शहरातील कथित एकतर्फी प्रेमाच्या घटनेत एका चौदा वर्षीय मुलीचा क्रूर बळी गेला. या घटनेचा तपास होऊन यातील वास्तव बाहेर आलेही, कुणाला शिक्षाही झाली पण या घटना पूर्णपणे बंद का होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत भय इथले संपत नाही, हे सत्य नाकारता येत नाही, त्यामुळे पालकांनी सावधान होऊन आता तरी मुलांना वेळ देण्याची गरज आहे, अशी चर्चा सध्या पुणे जिल्ह्यात रंगली आहे.
वर्षानुवर्षे रूढी वादाचे कारणाने स्त्रियांसह मुलींचे भयानक शोषण झाले हे आता सर्वश्रृत आहे. आणि हे शोषण नष्ट करण्यासाठी सामाजिक मानसिकताही तयार झालेली दिसून येत आहे. आपली मुलगी शाळेत जाईल, तिला उच्च शिक्षण देता येईल, तिला पायावर उभी करता येईल यासाठी पालक खूप कष्ट घेतात, हे जितके खरे आहे.
तितके हेच पालक त्या मुलांशी किती हितगूज करतात, तसेच त्यामुळे मुले घडण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यांच्यात किती समन्वय साधतात हाच खरा प्रश्न आहे. कित्येक घटनांमधून मानसोपचार तज्ज्ञांनी याच गोष्टींवर बोट ठेवले आहे. पूर्वी खूप छान पद्धत होती कि वडील कामावर जायचे आणि आई घरात असायची. आई घरात असली कि मुलांना पूर्ण वेळ देत असायची. तसेच आजी आजोबा घरातच असायचे. त्यामुळे नातवंडांना शिकवण्यात ते स्वतःला धन्यता मानायचे.
आता आई-वडील दोघेही उच्चशिक्षित असल्यामुळे जास्त पैसे कोण कमावते यांच्यातच स्पर्धा लागलेली दिसून येत आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी पडल्याचे दिसून येत आहे. पालकांनी आता अंतर्भूत होऊन आपण काही चुकत आहोत का याचा विचार करण्याची गरज आहे. शहरात कदाचित थोडेफार पालक दक्ष असण्याचे प्रमाण असेलही मात्र निमशहरी,
ग्रामीण भागात पालकांच्या उपस्थितीचे अत्यंत नगण्य प्रमाण असल्याचे वास्तव समोर येत आहे आणि हीच कमतरता सध्या जर पालकांनी भरून काढली तर अशा घटना नक्कीच दुर्मिळ होण्यास उशिर लागणार नाही. यासाठी आता तरी पालकांनी दक्ष होण्याची गरज आहे.
…आता तरी वेळ काढायलाच हवा
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत भाऊ, काका, मामा, चुलते, पुतणे, आजोबा हे नात्याची गरज पूर्ण करीत होते. आता कुटुंबे विघटित झाली, त्यात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. खर्च वाढला, मेटाकुटीला येत संसार सुरू झाले.
तरीही मुलींच्या शिक्षणासाठी कष्ट कमी झाले नाहीत ही बाब जितकी स्तुत्य आहे. तितकीच तिला योग्य वेळी सहवास देणे ही बाबही पालकांसाठी तितकीच महत्वाची झाली आहे. त्यासाठी काही झाले तरी वेळ काढायलाच हवा आणि हे चॅलेंजही स्वीकारायलाच हवे, हे तितकेच खरे आहे.