औरंगाबादमध्ये घडलेल्य भीषण रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. यापूर्वीही अशाप्रकारे रेल्वे अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. अशा या भीषण रेल्वे अपघातांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा…
2013
19 ऑगस्ट 2013
बिहारमधील खगडिया जिल्ह्यात राज्यराणी एक्सप्रेसने 37 जणांना उडवले होते. समस्तीपुराहून सहरसा जाणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसने ट्रॅकवरुन चालणाऱ्या कावडियांना उडवले होते.
2 नोव्हेंबर 2013
रायगड येथून विजयवाडाला जाणाऱ्या ट्रेनने आंध्र प्रदेशमधील गोतलाम रेल्वे स्थानकामध्ये आठ जणांना चिरडले होते.
28 डिसेंबर 2013
आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील पुत्तापर्थीजवळ बंगळुरू-नांदेड एक्सप्रेसच्या एसी डब्ब्याला आग लागल्याने 26 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये 12 जण जखमी झाले होते. मरण पावलेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता.
2014
8 जानेवारी 2014
वांद्रयाहून देहरादूनला जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीच्या तीन स्लीपर डब्ब्यांना आग लागल्याने पाच जाणांचा मृत्यू, तर चौघे जखमी झाले होते. हा अपघात सूरतजवळील धनाउ रोड आणि घोलवड स्टेशनच्या दरम्यान झाला होता.
17 फेब्रुवारी 2014
नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये निजामुद्दीन एर्नाकुलम लक्षद्वीप मंगला एक्सप्रेसचे 10 डब्बे रुळावरुन घसरले होते. यामध्ये तीन जणांचा मृत्यू, तर 37 प्रवासी जखमी झाले होते.
4 मे 2014
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी ट्रेनचे इंजिन आणि सहा डब्बे रुळावरुन घसरले होते. या अपघातामध्ये 18 जणांचा मृत्यू, तर 124 प्रवासी जखमी झाले होते.
26 मे 2014
उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर जिल्ह्यामध्ये गोरखधाम एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली होती. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात चुरेन रेल्वे स्थानकाजवळ झाला होता.
2015
20 मार्च 2015
देहरादूनवरुन वाराणसीला जाणाऱ्या जनता एक्सप्रेसचे काही डब्बे रुळावरुन घसरले होते. या अपघातामध्ये 34 जणांचा मृत्यू झाला होता.
2016
20 नोव्हेंबर 2016
कानपूरच्या पुखरायामध्ये इंदौर-राजेंद्र नगर एक्सप्रेस रुळावरुन घसरली होती. या अपघातामध्ये दीडशे प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 260 जण जखमी झाले होते.
2017
21 जानेवारी 2017
कुनेरुजवळ जगदलपूर-भुवनेश्वर हीराखंड एक्सप्रेस गाडी रुळावरुन घसरली होती. यामध्ये 40 प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर 68 जण जखमी झाले होते.
30 मार्च 2017
उत्तर प्रदेशमधील महोबामध्ये महाकौशल एक्सप्रेस रुळावरुन घसरली होती. यामध्ये 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.
15 एप्रिल 2017
मेरठ-लखनऊ राज्यराणी एक्सप्रेसचे 8 डब्बे उत्तर प्रेदेशमधील रामपुरजवळ रुळावरुन घसरले होते. यामध्ये 10 जण जखमी झाले होते.
2018
10 ऑक्टोबर 2018
मालदा टाऊनवरुन नवी दिल्लीला जाणाऱ्या न्यू फरक्का एक्सप्रेसच्या इंजिनसहीत नऊ डब्बे रुळावरुन घसरले होते. रायबरेलीजवळ हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये सात जणांचा जीव गेला होता तर 35 हून अधिक प्रवासी जखमी जाले होते.
19 ऑक्टोबर 2018
अमृतसरमध्ये दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रावणदहनाच्या कार्यक्रमामध्ये मोठा रेल्वे अपघात घडला होता. रेल्वे ट्रॅकवर उभ्या असणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवले होते. यामध्ये 61 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 हून अधिकजण जखमी झाले होते. हा अपघात जोडा फाटक परिसरामध्ये झाला होता.