नवी दिल्ली – संपूर्ण जग सध्या करोनाच्या भीतीच्या छायेखाली आहे. या संकटात जगभरात चीनचा द्वेष केला जात आहे. अशातच भारताने या संधीचा फायदा घेत परकीय गुंतवणुकीला आकर्षित केले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे.
नितीन गडकरी यांनी जपानचे उदाहरण देत म्हणाले कि, चीनमधील जपानी कंपन्या आपले व्यवसाय गुंडाळत आहेत. या कंपन्यांनी देशातच गुंतवणूक करण्यासाठी जपानच्या सरकारने आर्थिक पॅकेज घोषित केले आहे. आपल्यालाही याचा विचार करून लक्ष केंद्रित करायला पाहिजे.
परकीय गुंतवणुकीस चालना देण्यासाठी क्लिअरन्स आणि यासारख्या सेवा-सुविधा वेगवान करण्यात याव्यात. अर्थमंत्रालयासहित सर्व विभाग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करोनानंतरच्या लढाईसाठी अनेक योजना तयार करत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाची ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पूर्ण होईल. यादरम्यान आपण १०० लाख कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चरही तयार करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.