नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठा पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत दिल्लीकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 48 जागांवर भाजपने विजय मिळाला. तर ‘आप’ला 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत भाजपची सत्ता आली. यावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले होते अण्णा हजारे?
मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं पण त्यांनी दारुवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले होते. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर टीका केली होती.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“दिल्ली विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव असून तो निकाल मी मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली”, असा टोला उद्धव ठाकरेंनी अण्णा हजारेंना नाव न घेता लगावला होता.
संजय राऊतांची टीका
“अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचे काम अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी केले. अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती? रामलीला मैदान, जंतर-मंतर रोड कधी पाहिला असता? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहिती झाले, नाही तर ते राळेगणचे दैवत होते. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले.
मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचे सरकार असेल, त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही, हे दुर्दैवाने सांगायला लागत आहेत. भ्रष्ट सरकारच्या बाजूने ते उभे राहिले. अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद आहे”, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेला अण्णा हजारे यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले.
“ज्या रंगाचा चष्मा असतो, त्या रंगाचे जग दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे, त्यामुळे जग दिसणारच तसं, आपण कशाला काय बोलायचं”, असे म्हणत अण्णा हजारेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.