नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची पूर्णपणेआरोग्य आणि अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. कोरोनामुळे भारताला खूप मोठा फटका बसला असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळत आहे. भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील करोना स्थितीवर भाष्य केले आहे.
भारतामधील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगताना संकटाच्या काळात मदत केली जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी भारतातील परिस्थिती विदारक असल्याचे म्हटले आहे. भारतात करोना संकट गहिरे होत असतानाच जागतिक आऱोग्य संघटनेकडून हे वक्तव्य आले आहे.
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर यांसाठी धावपळ करावी लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्राह दिल्ली, कर्नाटक अशा अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले आहेत.
“जागतिक आरोग्य संघटना जे शक्य आहे ते सर्व करत आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे,” अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे. करोना संकटाशी सामना करताना आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून २६०० तज्ञ भारतात पाठवण्यात आल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले.