दुबई – आयसीसीने आगामी 2027 आणि 2031 सालच्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 10 ऐवजी 14 संघांचा समावेश करण्यात येईल, असे जाहीर केले. यामध्ये एका गटात प्रत्येकी सात संघांचा समावेश असेल. गटातील अव्वल तीन संघ सुपर-सिक्स फेरीत दाखल होतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी होईल.
यापूर्वी 2003 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत याच आराखड्यानुसार सामने खेळवले गेले होते. तसेच 2024 सालापासून दर दोन वर्षांनी टी-20 विश्वकरंडकही खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या मोसमात चॅम्पियन्स करंडक स्पर्धेऐवजी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला प्राधान्य देण्यात आले. परंतु 2025 आणि 2029 साली चॅम्पियन्स करंडक पुन्हा रंगणार आहे.
बीसीसीआयला मिळाली मुदत
करोनाच्या पार्श्वभूमीवर टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला 28 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. आयसीसीच्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा हेसुद्धा उपस्थित होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत भारतात टी-20 विश्वकरंडक होणार आहे. मात्र, भारतातील करोनाचा धोका पाहता ही स्पर्धा अमिराती येथे खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
विश्वकरंडकापूर्वी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील उर्वरित सामने अमिरातीत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळेच तिथेच विश्वकरंडक स्पर्धा खेळवणे सोयीचे ठरेल, असे मत अनेक देशांच्या मंडळांनी आयसीसीकडे व्यक्त केले आहे. ऑक्टोबरमध्ये विश्वकरंडकाचे आयोजन करणे शक्य नसल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा जूनमध्ये भारतात ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय आहे. मात्र, फेब्रुवारीत महिला विश्वकरंडक स्पर्धा आहे, तर जूनमध्ये आयपीएल संपल्यावर भारतात पावसामुळे काही सामन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.