- कोणी बनले “डिलव्हरी बॉय’ तर कोणी हेल्पर
- सर्व गोष्टींचे सोंग करता येते; पण पैशाचे नाही
उमेश अनारसे
पिंपरी – करोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनपेक्षित उलाढाल झाली आहे. अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. करोनाचा परिणाम सर्वसामान्य व्यक्तींना जेवढा भोगावा लागला तेवढाच धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील महाराज, गायक, वादक मंडळींना देखील याचा फटका सहन करावा लागला आहे. अक्षरशः काही महाराज मंडळींनी करोनाकाळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हॉटेल व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, “डिलव्हरी बॉय’ आणि उद्योगांमध्ये हेल्पर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे.
देहू आणि आळंदीचा शेजार लाभलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये असंख्य कीर्तनकार आणि वारकरी मंडळी वास्तव्यास आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व विचारधन दान करणारे ते कीर्तनकारही या करोनाच्या तावडीतून सुटू शकले नाहीत. बहुतांश कीर्तनकारांनी करोनामुळे कीर्तन, मंदिर तसेच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने तात्पुरत्या स्वरूपात का होईना इतर व्यवसाय, नोकरी अथवा मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवली आहे.
काहींनी चाकण, पिंपरी, आळंदी, देहू परिसरात नामांकित कंपन्यांमध्ये डिलव्हरी बॉय, हेल्पर, अथवा इतर कामे करण्यास सुरुवात केली आहे. कारण सर्व गोष्टींची सोंगे माणूस करू शकतो; परंतु पैशाचे सोंग करता येत नाही, असे दैनिक प्रभातसोबत केलेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी सांगितले. दिवाळी पाडव्यापासून मंदिरे खुली करण्यात आली आहेत. परंतु अजूनही मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत नाहीत. तसेच कीर्तन, हरिनाम सोहळे, उत्सव अद्याप सुरू नसल्याने अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली दिसून येत नाही. त्यामुळे हातचे काम सोडून घरी बसणे शक्य नाही.
पोशाखात करावा लागला बदल
वारकऱ्याची एक वेशभूषा आहे. कंबरेला धोतर, अंगात नेहरूशर्ट, बंडी तसेच डोक्याला टोपी अथवा फेटा, गळ्यात उपरणे, कपाळाला गोपीचंदन टिळा, गळ्यात तुळशीची माळ असा पेहराव असणारे सतत माऊली माऊली असा मुखात नामजाप असतो. परंतु करोना महामारी आली आणि अनेकांचे जीवन बदलले. पांढरेशुभ्र कपडे घालून समाजप्रबोधन करणाऱ्या महाराज मंडळींवर वेशभूषा बदलून पॅन्ट, शर्ट घालून कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम करण्याची वेळ आली आहे. समाजात असणारा मान, सन्मान सर्व विसरून मिळेल काम करणे कठीण जात असले तरी शेवटी घर, प्रपंच आणि उदरनिर्वाह करण्यासाठी हे सर्व करण्याची वेळ अनेक महाराज मंडळींवर करोनाने आज आणली आहे.
आळंदी, देहू सोडण्याची वेळ
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून, खेड्यापाड्यांतून आळंदी, देहू येथे आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथेच राहून संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती करत समाजप्रबोधनाचे कार्य करतात. परंतु करोनाकाळात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने आळंदी, देहू येथे भाड्याच्या घरात राहून समाजप्रबोधन करत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या महाराज मंडळींना आर्थिक उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याने तीर्थक्षेत्रे सोडण्याची वेळ आली आहे.
अजूनही ‘माऊलीं’वर भिस्त
आळंदी, देहू येथील बहुतांश महाराज मंडळींनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज व भगवंतावर विश्वास ठेवत आज ना उद्या ही परिस्थिती संपेल. जनजीवन पूर्वपदावर येईल. ठेविले अनंते तैसेची राहवे। चित्ती असू द्यावे समाधान।। या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे अंत:करणात दृढ निश्चय करत आध्यात्मिक वाचन सुरू ठेवले आहे. माऊलीच आपल्याला या संकटातून तारुण नेहतील असा विश्वास त्यांच्या ठायी आहे. त्यामुळे काहींनी आपल्या जवळच्या अपत्येष्टांकडून हात उसणे पैसे घेऊन जीवनचर्या सुरू ठेवली आहे. करोनाचे संकट जाऊन परिस्थिती पूर्वपदावर येऊन सर्व गोष्टी सुरळीत सुरू होतील अशी आशा महाराज मंडळींना आहे.
वारकरी, कीर्तनकार हा अखंड धर्मप्रसाराचे काम करत असल्याने त्याला इतर व्यवसाय अथवा नोकरी करणे शक्य नाही. परंतु करोनामुळे सर्वच ठप्प झाल्याने उपजीविकेचे साधन बंद झाले. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी, धंदा अथवा व्यवसाय करणे वावगे नाही. त्यामुळे बहुतांश कीर्तनकारांनी नोकरी, व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. वारकरी हा निष्काम आहे निष्क्रिय नाही. त्यामुळे वेळेनुसार बदल स्वीकारणे गरजेचे आहे.
– श्रीकांत महाराज दुराफे, आळंदी