पुणे – मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीला जोडणारा आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याने तीन वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद केला होता. येथे नवीन पूल बांधण्यासाठी सप्टेंबरमध्ये संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र, पावसाळ्यामुळे काम सुरू झाले नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी आंबी येथील पूल कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आंबी येथील सुमारे 50 ते 60 वर्षे जुना आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने बंद करण्यात यावे, असे पत्र बांधकाम खात्याने पोलीस आणि एमआयडीसीला दिले होते. तरीही पुलावरून 40 टन वजनाच्या गाड्या जास्त होत्या. या ठिकाणी पूल बंद आहे व धोकादायक आहे, अशा आशयाचा फलकही लावण्यात आला. मात्र तो अज्ञात लोकांकडून काढण्यात आल्याचे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
येथील प्रस्तावित नवीन पूल सुमारे 90 मीटर लांबीचा व 10 मीटर रुंदीचा असणार आहे. यासाठी 6 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.