शिवाजीराव आढळराव पाटील : नारायणगाव येथे शाखेचे उद्घाटन
जिल्ह्यात नवीन पाच शाखा सुरू करणार
सभासदाच्या विश्वासावर आज 14 शाखा कार्यरत असून येत्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात नवीन 5 शाखा सुरू करण्यात येणार आहे. 1985 पासून सर्वसामान्यांनी विश्वास ठेऊन पैसे जमा करून पतसंस्थेची स्थापना केली आहे. तेव्हापासून टप्याटप्याने पुणे जिल्हा, नवी मुंबई, वाशी, ठाणे, घाटकोपर येथे शाखा सुरू केल्या आहे. लवकरच शिरूर, राजगुरूनगर, चाकण व जुन्नर येथे नवीन शाखा सुरू होणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
नारायणगाव – सभासदाचे हित जोपासत नफा कमविणे हा उद्देश न ठेवता सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून होत आहे, अशी माहिती माजी खासदार व संस्थांचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नारायणगाव येथील 14 व्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आढळराव बोलत होते. संस्थेचे उद्घाटन अनंत घोष मौनी बाबाजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शरद सोनवणे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, जयहिंद उद्योग समूहाचे अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ, कल्पना आढळराव, अरुण गिरे, माउली खंडागळे , संभाजी तांबे, शरद चौधरी, गणेश कवडे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, गुलाब पारखे, बाळासाहेब पाटे, सुनील बाणखेले, मंगेश काकडे, लक्ष्मण काचोळे, संतोष दांगट, अरिफ आतार, राजेश बाप्ते, हनुमंत तागड, योगेश बाणखेले, भिकाजी बोकड, राम तोडकर, शोभा आवटे, मुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव आदी मान्यवरांसह आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शिवजीराव आढळराव म्हणाले की, भैरवनाथ नागरी पतसंस्था सहकार क्षेत्रात कार्यरत असतानाही सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात ही कार्यरत आहे. केंद्र सरकारने सहकार कायद्याचे नियम जाचक केले आहेत. नोटा बंदीमुळे सहकारात मोठे संकट आले आहे. दुष्काळामुळे जुन्नर, शिरूर, खेड तालुक्यात जानेवारीपासून टॅंकर सुरु आहेत. जुन्नर तालुक्यातील सायली ढमढेरे हिला एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागल्याने संस्थेने उपचारासाठी 1 लाखांची मदत केली आहे. संस्था सामाजिक हिस जोपासत गेली 10 वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे टॅंकर, चारा वाटप करीत आहे. अणे पठार व कोल्हे वाडी येथे घरासाठी आर्थिक मदत केली आहे. सर्वसामान्यपर्यंत पोहोचणारी अर्थव्यवस्था म्हणजे पतसंस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार शरद सोनवणे म्हणाले की, सहकारात वारंवार होणारे बदल हे बॅंकिंग क्षेत्रासाठी हिताचे नाहीत. सर्व सामन्याच्या आपुलकीची बॅंक व सहकारात पत निर्माण करणारी भैरवनाथ पतसंस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मेहेर तर संचालक महेश ढमढेरे यांनी आभार मानले.
संस्था स्थापनेपासून सभासदाच्या हिताचे निर्णय घेतल्याने आज संस्थेच्या 215 कोटीच्या ठेवी, 149 कोटींचे कर्ज वाटप, नफा 1 कोटी 79 लाख आहे. डिजिटल युगात सभासंदासाठी कोअर बॅंकिंग प्रणाली सुरु आहे. व्यासायिकांसाठी डीडी, एनइएफटी, आरटीजीएस अशा सुविधा देत असून शिवाजीराव आढळराव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगती सुरू आहे.
– सागर काजळे, संचालक, भैरवनाथ पतसंस्था