जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; विधानसभा निवडणुकीपासून काम होते बंद
पुणे – शहराच्या पूर्वभागासाठी वरदान ठरणारा महापालिकेच्या भामा- आसखेड प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार उद्या (शुक्रवार) पासून या योजनेचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू होणार आहे.
शहराच्या पूर्व भागातील नगररस्ता, वडगाव शेरी, खराडी, लोहगाव या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेड पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. 2012 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे काम 2017 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, पुनर्वसनाचा प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हे काम वेळोवेळी बंद पाडले होते. त्यामुळे जवळपास तीन ते पाच वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प आठ वर्षानंतरही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे सुमारे 374 कोटींच्या या प्रकल्पाचा खर्च सुमारे 50 ते 60 कोटींनी वाढला आहे.
तसेच शहराला पाणी संकटाचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर रखडलेल्या कामाला पुन्हा सुरुवात झाली होती. मात्र, जून महिन्यात हे काम प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा बंद पाडले होते. त्यानंतर आमदार टिंगरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे हे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने हे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.