पिंपरी – माझ्या नवऱ्याला कुणीतरी मारले आहे, अशी फिर्याद घेऊन पोलिसांकडे गेलेल्या महिलेलाच पोलिसांना आरोपी म्हणून अटक करावे लागले. तपासादरम्यान फिर्यादी महिलेनेच आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे सत्य समोर आले. उर्सला येशू दास (वय 39 रा. देहुरोड) असे अटक करण्यात आलेले आरोपी महिलेचे नाव आहे.
उर्सला येशू दास ही महिला मंगळवार (दि. 29) रोजी प्राधिकरण पोलीस चौकीत आली आणि तिचा पती येशू मुर्गन दास (वय 45) याला गुरुदेवनगर, चव्हाण चाळ, आकुर्डी येथे अज्ञात इसमाने मारुन गंभीर जखमी केले असल्याचे सांगितले.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी इसमास उपाचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
खूनाचा प्रकार असल्याने तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व दिशेने तपास सुरू केला. फिर्यादी उर्सला ही महिला एका स्कूल बसमध्ये काळजीवाहक म्हणून तीन वर्षांपासून काम करत होती. तपासात उर्सला हिचे बसचा चालक भाऊराव राम आरे (वय 24 रा. तळवडे) यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे कळाले. यावरुन पोलिसांनी आरे याची चौकशी केली असता गूढ उलगडले. त्यानुसार पोलिसांनी रज्जाक नसरुद्दीन शेख (वय 19) आणि लखन सहदेव कापरे (वय 21, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) यांना संशयावरून अटक केली. या दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा खून करण्यासाठी आरे आणि उर्सला या दोघांनी एक लाख 30 हजार रुपयांची सुपारी दिली होती हे मान्य केले. त्यानुसार पहाटे येशू झोपलेल्या खोलीत जाऊन आरोपींनी कोयत्याने वार करुन त्याचा खून केल्याची कबुलीही दिली.