माजी पालकमंत्री राम शिंदे यांचा इशारा
नगर (प्रतिनिधी) – राम शिंदेचा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता, त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्न येत नाही. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे, व जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले आहे. सर्व पदे मी भोगली आहेत. पक्षाचेही योगदान त्यामध्ये आहे. त्यामुळे मला चॅलेंज विखे कुटुंबियांनी करू नये, असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडचा विकास झालाच नाही, असे केलेले वक्तव्य चुकीची आहे. मी केवळ पुस्तकातच नाही, तर प्रत्यक्षात विकास करून दाखवला. हा विकास करताना विरोधकांना सुद्धा मी सोबत घेतलं होतं. मला माझ्याच मतदारसंघात विरोधक शिल्लक राहिला नाही, म्हणूनच रोहित पवार यांनी माझा मतदार संघ निवडला असावा, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. निदान आता तरी जनतेला पवार यांनी दिलेली आश्वासन पूर्ण करून दाखवावी, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी राम शिंदे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उपस्थित होते. भाजप उमेदवारांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण सांगा, असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. यावर विचारले असता राम शिंदे म्हणाले की, माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता, आम्ही कर्तृत्वाने पुढे आलो आहोत.
जनतेने आम्हाला निवडून दिले. आम्हाला जनाधार होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला चॅलेंज देण्याचे काहीच कारण नाही, आणि त्यांनी देऊ नये, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आमचा पराभव झाला, या संदर्भामध्ये पक्षाने वरिष्ठ पातळीवर कमिटी नेमलेली आहे. ते त्याचा अहवाल देणार आहे. त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच, असे शिंदे यांनी सांगून आमच्या मध्ये कोणताही समेट झालेला नाही, अशी स्पष्टोक्ती सुद्धा दिली. नगर जिल्हा विभाजनाचा विषय मी ज्या पद्धतीने हाती घेतला, तो आगामी काळामध्ये सुद्धा सुरू राहील. जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी आग्रही राहणार आहे. आमच्या कार्यकाळात हे विभाजन होऊ शकले नाही, हे जरी खरे असले तरी निवडणुकीच्या तोंडावर सात जिल्ह्यांचे विभाजन करावे, असा विषय होता. त्यामध्ये नाशिक, बीड, ठाणे आधी जिल्ह्यांचा समावेश होता. निवडणुकीच्या तोंडावर जर विभाजन झाले असते, तर त्याचा वेगळा संदेश गेला असता. त्यामुळे तो विषय प्रलंबित राहिला.
जिल्हा विभाजन झाल्यावर नगरचे मुख्यालय हे नगर आहे, उत्तरेचे मुख्यालय कुठे करायचे, हा राज्य शासनाचा विषय आहे. त्याबाबत सरकार निर्णय घेईल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी देऊन जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी आग्रह धरणार असल्याचे सांगितले. महाआघाडीच्या सरकार स्थापन होऊन आता सव्वाशे दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही नगरला पालकमंत्री आले नाहीत. पालकमंत्री येण्यास उशीर झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक बैठका या होऊ शकला नाहीत. मात्र इतर जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पद येऊन बैठका झाल्या. वास्तविक पाहता आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्रिपद नसल्यामुळेच हा घोळ सुरू असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. मी मंत्री असताना तालुक्यांमध्ये मोठा निधी आणला. मि मंजूर केलेल्या योजनांचा आता कुटुंबच्या कुटुंब उद्घाटन करत चालले आहे. माझा उद्घाटनाला विरोध नाही. मात्र कुटुंबातील व्यक्तींनी उदघाटन करणे हे राजशिष्टाचारला धरून नाही, असा टोला पवारांचे नाव न घेता शिंदे यांनी लगावला.
माझी लढाई मोठ्या घरण्यासोबत होती
माझी लढाई मोठ्या घरण्यासोबत होती. वास्तविक पाहता पाच ते सहा ठिकाणी रोहित पवार यांना उमेदवारीला विरोध झाला. त्यांना कुणी शिरकाव करू दिला नाही. मात्र या ठिकाणी त्यांना स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवार कोणी मिळाला नाही, त्याचा फायदा घेऊन साम-दाम-दंड यांचा वापर केला, व निवडणूक जिंकली, असा आरोपही माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी यावेळी केला.