मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक चकमक पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी राज्यातील कोरोनाच्या पार्शवभूमीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कदाचित डब्ल्यूएचओ ही मार्गदर्शनासाठी बोलावू शकते असा खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरेशा चाचण्या होत नाहीत महाराष्ट्रात करोना मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे, करोनावर उपाय योजना करण्यात काहीसे अपयश आले आहे असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्याबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. बडी आसामी आहे. त्यांना कदाचित WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
करोनाचं संक्रमण रोखणे, त्याचा वेग मंदावणे हे महत्त्वाचे आहे. गर्दी टाळा, सतत हात धुवा, मास्क लावा हे सगळे नियम पाळा असे वारंवार सांगितले जात आहे. आपण सध्या अनलॉकच्या प्रक्रियेतच आहोत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करावे लागले कारण ते करोनाच्या प्रसारावर अवलंबून होते. त्यामुळे तिथे लॉकडाउन करावा लागला असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. आपण निर्णय घ्यायचा असतो आणि प्रशासनाकडून काम करुन घ्यायचे असते असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच चष्मा लावायला हरकत नाही पण डोळ्यावर झापडं लावू नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण करोनाच्या काळात रुग्णालयं उभारली आहेत, आवश्यक त्या सगळ्या उपाय योजना केल्या आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. करोना विरोधातला लढा सुरु आहे. पण कुणीही गाफिल राहू नका असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.