पिंपरी – शिवसेनेत झालेल्या आमदारांच्या बंडानंतर राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीचे परिणाम आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अस्वस्थता पहावयास मिळत असून इच्छुकांमध्येही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजप सोडून राष्ट्रवादीत येऊ पाहणाऱ्या इच्छुकांसह आजी-माजी नगरसेवकांनी “वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीबाबत गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेले शुक्लकाष्ठ काही केल्यास संपेना अशी स्थिती सध्या राजकीय पटलावर पहावयास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्यामुळे सध्या महापालिकेवर प्रशासकीय राज सुरू आहे. सुरुवातीला करोना व त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पाच महिने निवडणुका लांबल्या आहेत. निवडणूक आयोगाने प्रभागरचना अंतिम केल्यानंतर मतदारयाद्याही आज (दि. 23) अंतिम केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि पावसाच्या शक्यतेवर येत्या दोन महिन्यांत महापालिका निवडणुकीचा धुराळा उडणार हे स्पष्ट झालेले असतानाच शिवसेना आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सरकार राहणार की पडणार? याची चर्चा सुरू झाल्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुक व स्थानिक नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता पहावयास मिळत आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शहरातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही घटक पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी तयारी चालविली होती. सत्ताधारी भाजपला टक्कर देण्यासाठी तीन पक्ष मिळून महापालिका निवडणुका लढतील अशी शक्यताही निर्माण झाली होती. तर या तीनही पक्षातील इच्छुकांनी काही प्रमाणात निवडणुकीची तयारी चालविली असताना शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याने इच्छुक धास्तावल्याचे पहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीची सत्ता राज्यातून गेल्यास त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्येही उमटण्याची शक्यता असून सध्या तरी या तीनही पक्षाचे नेते “बॅकफूट’वर गेल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीला फटका
राज्यातील सत्ता गेल्यास महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातच हे पक्ष एकत्र न राहिल्यास स्थानिक पातळीवरही हे पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता मावळू लागल्याने त्याचा फटका या पक्षांना बसू शकतो. तर अजित पवारांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भाजपातून राष्ट्रवादीत येऊ पाहणाऱ्यांनी आतापासूनच आपली भूमिका बदलण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या महाविकास आघाडीचा स्वप्नभंग होणार की विरोधात राहूनही सत्ता खेचून आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपामध्ये उत्साह
राज्यात सत्ताबदलाचे संकेत मिळू लागल्याने स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी मिळणारी ताकद, महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली दरी तसेच शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट या बाबी भाजपाच्या पथ्थ्यावर पडणाऱ्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास बळावला आहे.
प्रभागरचनेवरूनही संभ्रम
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम मतदारयाद्या अंतिम करण्यापर्यंत पोहोचल्याने तीनच्या प्रभागानुसार निवडणुका होणार की भाजपची सत्ता आल्यास पुन्हा चारचा प्रभाग होणार यावरूनही सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढे गेल्यामुळे प्रभागरचनेत बदल होणार नाही असा एक मतप्रवाह असून भाजपच्या हाती निवडणूक आयोगासह सर्वच यंत्रणा राज्यात सत्ता आल्यानंतर एकवटू शकतात त्यामुळे प्रभागरचनेत बदल होणार असा दुसरा मतप्रवाह आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.