उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ग्रीन सिग्नल : मंगळवारी होणार अंतिम निर्णय
पुणे – तब्बल पाच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली पीएमपीची चाके पुढील आठवड्यात पुन्हा धावणार आहेत. शहरात मर्यादित स्वरूपात बससेवा सुरू करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सहमती दर्शविली आहे. मात्र, हा निर्णय स्थानिक पातळीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पीएमपी प्रशासनाने घ्यावा, अशा सूचना पवार यांनी केल्या असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्याबाबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी ही बैठक होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
करोनाच्या सावटामुळे राज्यशासनाने 23 मार्च रोजी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर पीएमपीचे प्रवासी संचलन पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर काही मार्गांवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बससेवा देण्यात येत होती. नंतर परराज्यातील मजुरांसाठी काही दिवस ही सेवा ठराविक मार्गावर देण्यात आली. तर आता पुणे स्टेशन आणि लोहगाव विमानतळावरून पीएमपीची सेवा काही प्रमाणात सुरू आहे. मात्र, त्याचवेळी शहरात सर्व खासगी तसेच शासकीय कार्यालये सुरू झाली असून व्यावसायिक अस्थापनाही सुरू झालेल्या आहेत.
मात्र, अद्याप पीएमपीची सेवा सुरू नसल्याने या अस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मर्यादित प्रवासी आणि सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करून पीएमपी सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पुण्यात आढावा बैठकीसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी पीएमपी तसेच दोन्ही महापालिकेच्या आयुक्तांची बैठक घेतली असल्याची माहिती आहे.
या बैठकीत, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून बस सेवा सुरू नसल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे बस सेवा मर्यादित स्वरूपात का होईना सुरू करावी यास पवार यांनी सहमती दर्शविली आहे. तसेच याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी तसेच सेवा सुरू करणे आणि संचलन किती असावे यासाठी दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने बैठक घेऊन सात दिवसांच्या आत याबाबत निर्णय घ्यावा अशा सूचना पवार यांनी या अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या आहेत. त्यामुळे पुढील आठवडयात पुणेकरांच्या सेवेत पीएमपी पुन्हा धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाच महिन्यांत 250 कोटींचा तोटा
दरम्यान, या पाच महिन्यांत पीएमपीला संचलन बंद असल्याने सुमारे अडीचशे कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. तर पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 10 हजार कर्मचारी असून त्यातील 4 हजार कर्मचारी पालिकेकडे करोनाच्या कामासाठी वर्ग करण्यात आले आहेत. तर 2 हजार कर्मचारी रोंजदारीवर असून त्यांना काम नसल्याने पीएमपीने विनावेतन ठेवले आहे.