सोपान येवले Wedding ceremony : सध्या लग्नसराईचा हंगाम उत्साहात सुरू असून गावागावांत लग्नसोहळ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक मिरवणुका, रंगीबेरंगी सजावट आणि मानपानाच्या कार्यक्रमांनी वातावरण जल्लोषमय झाले आहे. मात्र या सगळ्या गडबडीत लग्नाचा गाभा मानला जाणारा मुहूर्त हळूहळू मागे पडताना दिसत आहे. परिणामी, लग्नपत्रिकेत छापलेला मुहूर्त केवळ औपचारिकता उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पूर्वीच्या काळात लग्नसमारंभ म्हणजे शिस्त, परंपरा आणि वेळेचे काटेकोर पालन यांचा सुंदर संगम असायचा. मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जात असत. कुटुंबातील वडीलधारी मंडळी वेळेचे नियोजन करत आणि सर्व कार्यक्रम त्यानुसार आखले जात. त्यामुळे लग्नविधी वेळेत पूर्ण होऊन पाहुण्यांनाही समाधानाचा अनुभव मिळत असत. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आधुनिकतेच्या प्रभावामुळे ही परंपरा हळूहळू ढासळताना दिसत आहे. सध्याच्या लग्नसमारंभांमध्ये स्वागत समारंभ, मानपान, फोटोसेशन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध आकर्षणांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. अनेकदा पाहुण्यांचे स्वागत, स्टेजवरील कार्यक्रम, नृत्य सादरीकरणे आणि छायाचित्रण यामध्ये तासन्तास वेळ खर्ची पडतो. परिणामी, मुख्य विवाहविधी उशिरा सुरू होतो आणि मुहूर्त टळून जातो. काही ठिकाणी सकाळचा किंवा दुपारचा मुहूर्त असतानाही प्रत्यक्ष लग्नविधी सायंकाळी किंवा रात्री उशिरा पार पडत असल्याचे चित्र दिसते. यामागे वाढता दिखाऊपणा हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. लग्न समारंभ आकर्षक करण्याच्या नादात वेळेचे भान विसरले जाते. विशेषतः प्रतिष्ठित पाहुण्यांच्या आगमनाची वाट पाहणे, राजकीय व्यक्तींचे सत्कार, मोठ्या प्रमाणावर मानपान कार्यक्रम यामुळेही विलंब होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी पाहुण्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येकाचा सत्कार करण्यासाठी मोठा वेळ खर्ची पडतो. या सर्व घडामोडींमुळे वऱ्हाडी मंडळी आणि पाहुण्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागते. अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, तर काहींना उशिरा होणाऱ्या कार्यक्रमांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दूरवरून आलेले पाहुणे यांना या विलंबाचा अधिक त्रास होतो. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात बदल होणे स्वाभाविक असले, तरी त्या बदलामध्ये परंपरेचे महत्त्व कमी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लग्नसमारंभ अधिक आकर्षक करण्याच्या प्रयत्नात त्याचा गाभा हरवू नये, यासाठी कुटुंबांनी आणि समाजाने सजग राहणे गरजेचे आहे. पारंपरिक विधींना दुय्यम स्थान सोशल मीडियाचा वाढता प्रभावही या बदलामागे कारणीभूत ठरत आहे. लग्नसमारंभ अधिक आकर्षक आणि फोटोफ्रेंडली दिसावा यासाठी विविध कार्यक्रम आखले जातात. प्री-वेडिंग शूट, लाईव्ह व्हिडिओ, स्टेज डेकोरेशन, थीम-बेस्ड कार्यक्रम यामुळे लग्नाला एक वेगळे रूप मिळत असले, तरी त्यात पारंपरिक विधींना दुय्यम स्थान मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. काही ठिकाणी तर विवाहविधी केवळ औपचारिकता म्हणून घाईघाईत उरकला जात असल्याचीही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. Pune District : पौड तहसील कार्यालयासाठी 7.40 कोटींचा निधी; आमदार शंकर मांडेकर यांची माहिती