विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे शासनास पत्र
विश्रांतवाडी – राज्यात मंगल कार्यालये मोठ्या अडचणीत आहेत. याबाबत त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील मंगल कार्यालय संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेत त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. या समस्यांबाबत डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पत्र दिले आहे.
या पत्रात लक्ष वेधले आहे की, राज्यातील मंगल कार्यालयासाठी विवाहप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींसाठी 200 ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तथापि काही मंगल कार्यालये ही आकाराने मोठी आहेत. या करीता साधारणतः 40 चौरस फुटासाठी एक व्यक्ती, या प्रमाणात मंगल कार्यालयांच्या क्षेत्रफळावर आधारित व्यक्तींना परवानगी दिल्यास, सुरक्षित अंतराचे पालनही होईल. तसेच, मोठ्या मंगल कार्यालयांना काही प्रमाणात अधिक उत्पन्न मिळू शकेल, अशी मागणी डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.
मंगल कार्यालयात नागरिकांच्या उपस्थितीच्या मर्यादेमुळे तसेच मार्च 2020 पासून करोनामुळे लॉकडाऊन केल्यामुळे या व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यांचे नेहमीची खर्च थांबलेले नाहीत.
वीज बिल, पाणीपट्टी, घरपट्टी आदींमुळे हे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत आहेत. यामुळे मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यासाठी प्रॉप्रर्टी टॅक्स वाणिज्य दराने आकारण्यात येतो, तो कमी करून करोनाच्या कालावधीसाठी घरगुती दराने वसूल करण्याच्या सूचना संबंधित महानगरपालिका व नगरपालिकांना यांना देण्यात याव्यात याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र पत्राद्वारे सूचना केली आहे.