पुणे – मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याने गतवर्षीची पाणी पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत मागील वर्षापेक्षा 1 टीएमसी जादा पाणी जमा झाले आहे. या धरणांचा पाणीसाठा 26.33 टीएमसी (90 टक्के) झाला आहे.
तर मागील वर्षी याच कालावधीत 25.26 टीएमसी (86 टक्के) होता. दरम्यान, खडकवासला पाठोपाठ आता पानशेत धरणही शुक्रवारी सकाळी भरले असल्याने पानशेतमधून साडेचार हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. तर खडकवासलातूनही मुठा नदीत पहाटे पासून 16 हजार 247 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून चारही धरणांत पावसाचा जोर कायम असल्याने पाणलोट क्षेत्रातून धरणाच्या पाण्याचा वाढावा येत आहे. परिणामी, पाणीपातळी वेगाने वाढत आहे. पाटबंधारे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात 8 मिमी, पानशेत धरणात 27 मिमी, वरसगाव धरणात 32 मिमी तर टेमघर धरणात 56 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पानशेत भरले, वरसगाव भरण्याच्या मार्गावर
प्रणालीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे धरण असलेले पानशेत 100 टक्के भरले असून पानशेतमधून सकाळी 11 पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी 1,900 क्युसेकने सुरू असलेला हा विसर्ग दुपारी वाढविण्यात आला. सध्या धरणातून साडेचार हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी टेमघर धरणात येत असल्याने टेमघरही 75 टक्के भरले आहे. तर धरणसाखळीतील सर्वाधिक क्षमता असलेले वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. वरसगाव धरणाचा पाणीसाठा 11 टीएमसी (86 टक्के) झाला आहे.
सिंचनाचाही प्रश्न नाही
गतवर्षीपेक्षा पाणीसाठा जादा असल्याने पुढील वर्षभरासाठी पुणे शहर तसेच जिल्ह्यातील सिंचनाच्या पाण्याची समस्या सुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर कमी असला तरी, पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने ही धरणे 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही दमदार पाऊस होण्याचा हवामान विभागाचा इशारा असल्याने धरणांमधून पाणी सोडावे लागणार असल्याचे चित्र आहे.