जामखेड – जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात 31.82 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरासह वाड्या-वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटला आहे. रामेश्वर (सौताडा) येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने भुतवडा तलावात मोठ्याप्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे.
भुतवडा तलाव पाणलोट क्षेत्र परिसरात गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे तलाव कोरडाठाक पडलेला होता. तेव्हापासून तलावात पाणीच आलेले नव्हते. तेव्हापासून जामखेड शहराचा पाणीप्रश्न बिकट झाला होता. तसेच परिसरातील बहुतांश गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यावर्षी पावसाळा सुरू होऊन देखील तलावात पाण्याची आवक नव्हती. मात्र परतीच्या पावसाने तलावात 31. 81 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटण्यास मदत झाली आहे.
तलावात पाणी आल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ सुखावले आहेत. भुतवडा तलावातील जलसाठा राखून ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. तसेच तलावातून होणारी पाण्याची चोरी थांबवावी. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास थोडीफार मदत होईल. तालुक्यात एकूण 10 साठवण तलाव आहेत.
मात्र पावसाळा संपत आला, तरी ते कोरडे होते. परंतु मागील तीन दिवसांत परतीच्या पावसाने तालुक्यात चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले असून, तालुक्यातील मोहरी व नायगाव साठवण तलाव 100 टक्के भरले असून, उर्वरित तलावांत पाण्याची आवक सुरू आहे. तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांतील पाणीपातळीत वाढ झाल्याने नागरिकांची सोय झाली आहे.
साठवण तलावात थोड्या प्रमाणात पाणी आले आहे. परिसरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाचे दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे तलावात झालेल्या साठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. दोन वर्षांनंतर परवाच्या पावसाने या तलावात काही प्रमाणात पाणी साचले आहे. पुढील काळात टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने आतापासूनच तलावातील पाणीसाठा जपण्याचा प्रयत्न करावा.
संजय कोठारी सामाजिक कार्यकर्ता