कोपरगाव (प्रतिनिधी) – काकडी विमानळाच्या रनवेवरून वाहून जाणारे पाणी काकडी परिसरात भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाझर तलावात सोडले जाणार आहे. यासाठी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या कामाचा प्रारंभ नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कायमच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या काकडी व परिसरातील गावांचा विकास व्हावा व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना विमान प्राधिकरणाने दिलेली आश्वासने पूर्ण व्हावीत, यासाठी आ. काळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याचबरोबर विमानळाच्या रनवेवरून वाहून जाणारे पाणी भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाझर तलावात सोडावे, अशी काकडी ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांची मागणी विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत सातत्याने मांडल्यामुळे विमान प्राधिकरणाने या कामास हिरवा कंदील दिला.
आज आ. काळे यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील 50 लाख रुपये खर्चाच्या पाईपलाईन व पाझर तलावाच्या खोदकामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. विमानळाच्या रनवेवरील पाणी पाझर तलावात साठविले जावून याचा फायदा परिसरातील शेती आणि जलस्त्रोत यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
विमान प्राधिकरणाने पुढील टप्प्यात काकडीच्या तीन पाझर तलावांचे खोदकाम पूर्ण करून द्यावे, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, ऍड. राहुल रोहमारे, बाबासाहेब गुंजाळ, अनिल गुंजाळ, कौस्तुभ ससाणे व शेतकरी आदी उपस्थित होते.