फलटण -फलटण तालुक्याला वरदान ठरलेल्या नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी धोम-बलकवडी कालव्यातून तालुक्यातला मिळण्याच्या योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांचा आढावा आणि इतर प्रश्नांसंदर्भात मंगळवारी (दि. 31 जानेवारी) मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ना. फडणवीस यांनी हे निर्देश दिले. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. शहाजी (बापू) पाटील, आ. राहूल कुल, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, भाजपचे जयकुमार शिंदे व मान्यवर उपस्थित होते.
खा. रणजितसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी खंडाळा तालुक्यातील वीरकवली गावातील ओढ्यामधून धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यात सोडण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. नीरा-देवघरचे पाणी धोम-बलकवडी कालव्यात आल्याने हा कालवा आठमाही वाहणार आहे. याच प्रस्तावात खंडाळा तालुक्यातील वाघोशी, गावडेवाडी आणि शेखमीरवाडी या गावांच्या उपसा सिंचन योजनांचा नीरा-देवघर प्रकल्पाच्या प्रस्तावात मी समावेश केला होता. या प्रस्तावास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत होते. त्याला यश आले आहे.
ना. फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार नीरा-देवघर प्रकल्पासाठी तीन हजार 200 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी वाघोशी, शेखमीरवाडी व गावडेवाडी येथील उपसा सिंचन योजना पूर्ण करणे गरजेचे आहे. नीरा-देवघर धरण बांधून दशक उलटले तरी कालवे पूर्ण होत नव्हते. याचाच फायदा बारामतीला होत होता. आता या निर्देशांमुळे बारामतीला जादा जाणारे पाणी फलटण तालुक्यात वळवता येणार आहे. आगामी काळात नीरा-देवघरचे पाणी आंदरुडमार्गे पुढे माढा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यात जाण्याचा मार्गदेखील मोकळा झाला आहे.