लोणी-धामणी (पुणे) – आता नाही तर कधीच नाही’, राजकारण पुरे.. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या, अशी आर्त हाक म्हाळसाकांत पाणी योजना संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आल्याने पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पाणीप्रश्न पेटला आहे.
महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यातील अनेक जलसिंचन योजना या म्हळासाकांत योजनेच्या घोषणेनंतर झाल्या मात्र म्हळासाकांत जलसिंचन योजना कित्येक वर्षे प्रलंबित आहे. ऑक्टोबर महिना उजाडला; मात्र अजूनही या गावांना टॅंकर सुरू आहेत.
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर असणारी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, खडकवाडी, शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर, मांदळेवाडी, रानमळा आदी गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे शेतीला पाणी मिळावे यासाठी लोणी येथे रविवारी (दि. 3)शेतकरी मेळाव्यात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते प्रथमच एकत्र आले होते, त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आला.
जलसमाधी आंदोलनाचा इशारा
आजपर्यंत पाणी योजनेसाठी आंदोलने झाली; मात्र त्यास राजकीय झालर होती; परंतु आजचा मेळावा राजकीय जोडे बाजूला ठेऊन पक्ष विरहित झाला असून दुष्काळी गावे हा कायमचा पडलेला शिक्का पुसण्यासाठी तसेच योजना मार्गी लावण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याची, प्रसंगी हुतात्मा बाबू गेनू जलसागर-(डिंभे धरण) येथे कृती समितीच्या वतीने “जलसमाधी’ आंदोलन करावे लागले तरी आमची तयारी आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी पाण्यावाचून वंचित असणाऱ्या दुष्काळग्रस्त आठ गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते. या मेळाव्यात वेदिका करंजखिले, तनिष्का सोनार, दिक्षा वाळूंज, ऋतूजा आदक, गायत्री जाधव या शाळकरी मुलींनी दुष्काळ गावांची व्यथा मांडली.
पाणी हाच आमचा पक्ष
बाळाशिराम वाळूंज व गणेश तांबे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे जाहीर केले. यापुढे पाणी मिळेपर्यंत “पाणी हाच पक्ष’ असे सांगितले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाचे तालूका अध्यक्ष भगवान वाघ यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्याचबरोबर विठ्ठल ढगे, सोनभाऊ आदक, राजू सिनलकर, संजय पोखरकर, मयूर सरडे, विशाल तांबे, भीमराव वाघ, अनिल डोके, सुभाष जाधव, वामन जाधव, रवींद्र करंजखेले, उर्मिला धुमाळ, उद्धव लंके यांनाही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कृती समितीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी अनेक मान्यवरांनी 25 हजारांची देणगी दिली. या कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत सागर जाधव यांनी केले, प्रास्ताविक बाळाशिराम वाळूंज, सूत्रसंचालन किरण वाळूंज यांनी तर गणेश तांबे यांनी आभार मानले.