आंबेगाव बुद्रुक – महापालिकेने उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प हटवण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलनाला हिंसक वळण लागले. या प्रकल्पाच्या कार्यालयावर दगडफेक करून त्याची प्रचंड नासधूस केल्यानंतरही संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हा प्रकल्पच पेटवून दिला. तेथे जमा असणारा कचरा विझवण्यास सुमारे पाच दिवस लागण्याची शक्यात अग्निशामक दलाने व्यक्त केली.
रात्री उशिरापर्यंत याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, उरुळी येथील प्रकल्पाचा वाद नव्याने उकरला गेला असतानाच हा प्रकल्प पेटवला गेल्याने शहरात कचराकोंडीची शक्यता वाढली आहे.
आंबेगाव बुद्रुक आणि खुर्द या परिसराचा तीन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समावेश झाला; परंतु पालिका प्रशासनाने या भागासाठी ठोस विकास निधी दिला नाही, त्यातच हा प्रकल्प लादल्याने या भअगातील नागरिकांच्या मनात तीव्र नाराजीची भावना आहे. या प्रकल्पातील कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी निर्माण झाल्याने आरोग्य धोक्यात आल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली.
या प्रकल्पाला विरोध करावा, तो बंद करावा, यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आंबेगाव येथील भैरवनाथ मंदिरात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या मोठी होती.
यावेळी आंबेगावचे फुरसुंगी होऊ देणार नाही… देणार नाही, अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देण्यात आल्या. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण होऊ लागला. त्यातच उपस्थितांनी आपल्या संतप्त भावना पालिका प्रसासनाला समजण्यासाठी प्रकल्पावर मोर्चा काढला. हा प्रकल्प बंदच पाडायचा असे ठरवून या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता जेसीबीने खोदण्यात आला.
त्यावेळी आणखीच तापलेल्या काही युवकांनी प्रकल्प कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली.त्यांनी प्रकल्पाच्या कार्यालयावर दगडफेक सुरू केली. त्यामुळे त्यात असणारे काही कर्मचारी जीवाच्या भीतीने पळून गेले. त्यानंतर कार्यालयातील टेबल, खुर्च्या टीव्ही वातानुकूलित यंत्रणा फोडण्यात आल्या.
ते युवक परत आले. त्यानंतर काही जणांनी पुन्हा या प्रकल्पाकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर प्रकल्पच पेटवून देण्यात आला. प्रकल्पातील कचरा पेटताच आगीच्या ज्वाळा लांबवरून दिसत होत्या. धुराच्या लोटांनी आसमंत भरून गेला. प्रकल्प पेटवल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आणि अग्नीशामक दलाने तेथे धाव घेत आग आटोक्यात आणणण्याचे प्रयत्न सुरू केले.
या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर आदीसह पोलीस कर्मचारी बालाजी घंटे,रणजित पाटील उपस्थित होते.वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने उपस्थित होते. तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
आंबेगाव कचरा प्रकल्पाला आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला 2 वाजून 20 मिनिटांनी आला. अग्निशमन दलाची कात्रज, कोंढवा आणी सिंहगड येथील केंद्रातून चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. सुमारे तीन तीन मजल्यांचे पाच कचऱ्याचे ढीग आगीत धुमसत आहेत. सुमारे एक एकरवर हा प्रकल्प आहे. ही आग लावली गेली का लागली हे आताच सांगता येणार नाही. मात्र, त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू.
– प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी
ही आग लावण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादुष्टीने तपास करून गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. यात कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अचानक झालेल्या या प्रकरणात सर्व बाजूंचा विचार करून तपास सुरूआहे.
– विष्णू ताम्हाणे,
पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे