सततच्या पावसाने भिंती कोसळल्या
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठारभागात गेल्या पंधरा दिवसांपासून सूर्याचे दर्शन झालेले नाही. सततच्या रिमझिम पावसाने येथील मातीच्या घरांच्या भिंती कोसळत आहेत.
रविवारी चार शेतकऱ्यांच्या राहात्या घरांच्या भिंती पडल्या होत्या. आज दुपारी दोनच्या सुमारास गारोळे पठार येथील सोमनाथ आबाजी जाधव, शांताराम वारे व सांगडेवाडी येथील भीमा रामा सांगडे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या. त्यामुळे ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
सर्व कुटुंबे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून घराच्या भिंती कोसळल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी तीनही कुटुंबांनी केली आहे. कामगार तलाठी साईनाथ ढवळे व कोतवाल शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.