विशेष परवानगीचा राज्य शासनाला प्रस्ताव
बंदी उठताच करोनाचे विघ्न : हत्ती गेला पण शेपूट राहिल्याची स्थिती
पुणे – करोना संकटामुळे 4 हजार 500 जागांसाठीची पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती 5 महिन्यांपासून रखडली आहे. हा भरतीचा टप्पा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी राज्य शासनाकडून विशेष परवानगी मिळविण्यासाठीचा पाठपुरावा शिक्षण विभागाकडून सुरू आहे.
राज्यात 2012 नंतर शिक्षक भरतीला बंदी घातली होती. नंतर भाजप-शिवसेना युती शासनाने ती उठविली. दीड वर्षांपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या 12 हजार जागा भरण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पुढाकार घेऊन पारदर्शकपणे शिक्षक भरतीसाठी सतत प्रयत्न सुरू ठेवले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवायची भरती प्रक्रिया आधी सुरू झाली. पोर्टलवर उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड झाली. त्यांना तत्काळ नियुक्त्याही दिल्या. आतापर्यंत 6 हजार उमेदवारांना लाभ मिळाला आहे. माजी सैनिकांच्या
1 हजार 500 जागा कन्व्हर्ट करून भरती करण्यात येणार आहे. सुमारे 900 खासगी शाळांमधील 3 हजार शिक्षकांच्या जागा मुलाखती घेऊन भरण्याचे नियोजन आहे.
करोना संकटामुळे शासन तिजोरीत खडखडाट असल्याने वित्त विभागाने नवीन पद भरतीला बंदी घालण्याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे शिक्षक भरतीलाही अडचण निर्माण झाली. मात्र, शिक्षक भरतीची जाहिरात प्रक्रियेसह इतर प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेली भरती करण्यास विशेष परवानगीचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.
शिक्षक भरतीसाठी एनआयसीमध्ये सॉफ्टवेअरवरची कामे वेगाने सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकही होत आहेत. सर्व कामे पूर्ण करून ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांच्या तक्रारीही सोडविण्यात येत आहेत. न्यायालयीन प्रकरणेही निकाली निघावीत यासाठी कामकाज सुरू आहे. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर त्वरित भरती प्रक्रिया सुरू आहे.
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त