मेलबर्न – करोनाची साथ पसरायला लागल्यावर बेघर, निराधार आणि हातावर पोट असलेल्यांना दोन वेळचे अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शेकडो स्वयंसेवी संस्था पुढे आल्याची उदाहरणे आपण गेल्या 7 महिन्यात वाचली असतील.
मात्र देशातच नव्हे तर दूर ऑस्ट्रेलियातील एका भारतीयानेही स्वतःच्या एकट्याच्या बळावर गरजू विद्यार्थी आणि निराधारांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देऊन अन्नदानाचे पुण्य कमावले आहे. मेलबर्नमध्ये स्थायिक झालेले भारतीय वंशाचे दमन श्रीवास्तव यांनी ऑस्ट्रेलियात शिक्षण घ्यायला आलेले विदेशी विद्यार्थी आणि निराश्रितांची अडचण ओळखून त्यांना दोनवेळचे जेवण उपलब्ध करून मोठे मोलाचे काम केले आहे.
आता या भारतीय वंशाच्या दमन श्रीवास्तव यांच्या कामाचा पसारा इतका वाढला आहे की त्यांना आपल्या “फूड ट्रक’द्वारे गरजवंतांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी निधीची आवश्यकता भासायला लागली आहे.
दमन श्रीवास्तव हे मूळचे दिल्लीवासिय असून 1990 च्या दशकापासून त्यांनी काही काळ मध्यपूर्वेत आणि नंतर ऑस्ट्रेलियामध्ये आपला जम बसवला आहे.
व्यवसायाने शेफ असलेल्या दमन श्रीवास्तव यांनी आखाती युद्धाच्या काळातही इराकमध्ये अशाच प्रकारे गरजवंतांना अन्नदानाचे काम केले होते. बगदादमध्ये त्यांनी अक्षरशः शेकडो जणांना जेवायला घातले होते. आता मेलबर्नमध्येही त्यांनी तेच काम सुरू ठेवले आहे.
करोनाच्या साथीदरम्यान लॉकडाऊन लागू केल्यामुळे शेकडो जण आपापल्या घरातच अडकून पडले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार आणि उत्पन्नाचे साधनही सुटले. परदेशातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांजवळचे पैसे संपले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मात्र दररोज अन्न मिळवणे ही प्रत्येकाची किमान गरज गरज आहे हे ओळखून श्रीवास्तव यांनी स्वखर्चाने हा उपक्रम सुरू केला.
श्रीवास्तव यांनी आपल्या घरीच जेवण बनवायला आणि आपल्या कारमधून गरजावंतांना जेवण पुरवायला सुरुवात केली. आपल्या पत्नी आणि कन्येच्या मदतीने जवळपास 150 जणांचे जेवण बनवून ते वाटप करायला बाहेर पडत असत. आता त्यांच्या कामाची दखल ऑस्ट्रेलियातील माध्यमांनीही घेतली असून श्रीवास्तव यांच्या कार्यासाठी मदतीचा ओघ देखील सुरू झाला.
आपल्या कामात आर्थिक योगदान देऊ इच्छिणाऱ्यांसाठी श्रीवास्तव यांनी ऑनलाईन वेबपेज देखील सुरू केले आहे. गेल्या चार आठवड्यात त्यांना 13 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत मिळाली आहे. मात्र आपल्या फूड ट्रकसाठी त्यांना 70 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरच्या मदतीची अपेक्षा आहे.
आजच्या घडीला श्रीवास्तव यांचे 6 सहकारी या कामासाठी झटत असतात. अनेक स्थानिकांकडून त्यांना दर आठवड्याला किराणा मालाचीही मदत होत असते. आता तर करोनाची साथ संपल्यानंतरही हे अन्नदानाचे काम पुढे सुरूच ठेवायचे श्रीवास्तव यांनी ठरवले आहे.
“मी स्वतः गरिबी बघितली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीचे दोन दिवस मी स्वतः बेघर होतो. त्यावेळी आलेल्या अनुभवानेच आपल्याला इतरांची मदत करण्याची प्रेरणा दिली.’ असे त्यांनी सांगितले.