राहुरी विद्यापीठ – मुळा धरणाचे हक्काचे पाणी मिळवून देण्याची धमक तनपुरेमध्येच आहे. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनाच साथ देण्याचे आश्वासन पाथर्डी तालुक्यातील शिंगवे, रूपेवाडी, मिरी, कडगाव, खांडगाव, शंकरवाडी, शिराळ चिंचोडी, लोहसर आदी गावातील ग्रामस्थांनी दिले.
राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्यावेळी ग्रामस्थांनी आपल्या तक्रारीचा पाढा वाचत यंदा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी अनेक ग्रामस्थांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित करून केंद्र व राज्य शासनाच्या ध्येय धोरणांमुळे शेती संकटात आल्याचे सांगितले. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यावर टीका केली.
तनपुरे म्हणाले, आ. कर्डिले यांच्या निष्क्रियतेमुळे मुळा धरणाचे हक्काचे 3 टिएमसी पाणी बीड जिल्ह्याला दिले जात आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी व वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या आ. कर्डिले हे शासनाच्या हुकूमशाही धोरणांचा विरोध करूच शकत नाही. मुळा धरण लाभार्थी तहानलेले असतानाही हक्काचे पाणी जायकवाडीला जाताना पाहण्याची नामुष्की गेल्या अनेक वर्षांपासून ओढावत आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यावेळी सही करून संमती देणाऱ्या आ. कर्डिले यांनी शेतकऱ्यांची माफी मागण्याचे आवाहन तनपुरे यांनी केले. अमोल जाधव, विजू कुटे, अशोक गवळी, अशोक निमसे, सुभाष गवळी, जालिंदर वामन, प्रकाश शेलार, भागिनाथ गवळी, महादेव कुटे, आदिनाथ सोलट, राजू शेख, चंद्रकांत गवळी, बाबासाहेब झाडे, करीम शेख यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.