वडूज – येरळवाडी, ता. खटाव या गावाला पाणीपुरवठा करण्याऱ्या विहिरीत पडत असलेला कचरा व घाणीमुळे दूषित झालेले पाणी ग्रामस्थ पित आहेत. त्यामुळे गॅस्ट्रोसारखे आजार पसरत आहेत. याकडे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
,येरळवाडी येथे गेल्या काही दिवसापासून पिण्याचे दूषित पाणी पुरवले जात आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थ व लहान मुले साथीच्या आजाराने हैराण आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. येरळवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत; परंतु गेल्या काही दिवसांपासून तेथे आरोग्यसेवक नसल्याने ग्रामस्थांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे.
येरळवाडी येथील विहिरीत पाने, गवत, पक्ष्यांची घरटी, पक्ष्यांची विष्ठा यांनी जागा घेतली आहे. दूषित पाण्यामुळे सुरुवातीला गॅस्ट्रोची साथ सुरू झाली असून त्यानंतर बाकीचे साथरोगही पसरत आहेत. गावात जलशुद्धीकरण प्रकल्प करून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची वेळच्या वेळी स्वच्छता झाली पाहिजे. विहिरीच्या वरच्या बाजूला जाळी बसवल्यास कचरा पडणार नाही. योग्य उपाययोजना न केल्यास आक्रमक भूमिका घेऊ.
– श्रीराम बागल, युवा संकल्प सोशल फौंडेशन.