अतिवृष्टीग्रस्त गावाचा सर्वानुमते मोठा निर्णय; प्रशासनाचे धाबे दणाणले
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गारखेडा या अतिवृष्टीग्रस्त गावातील गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या प्रशासनाची चांगलीच झोप उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गावातील सर्व नागरिकांनी मिळून अख्खा गाव विक्रीला काढले असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात,”महोदय आपणास विनंती पूर्व अर्ज ग्रामस्थांच्यावतीने संयुक्त अर्ज सादर करण्यात येतो की, तीन वर्षापासून संपूर्ण परिसर अतिवृष्टी मुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त झाला आहे. यामध्ये सरकारने पिक विमा दिला नाही. अतिवृष्टीची मदत अजून मिळाली नाही. आज सणासुदीचा काळ असून सुद्धा आमची संपूर्ण गाव हे अंधारात आहे. त्याचबरोबर आम्हाला प्रत्येक सण हा काळोखात साजरा करावा लागतो आहे. तसेच खाजगी फायनान्स कंपन्यांनी आम्हाला तगादा लावला आहे. त्यासोबतच कोरोना काळात शेतकरी मृत्युमुखी पडला असून या शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी.
हिंगोली जिल्हा आत्महत्याग्रस्त घोषित करण्यात यावा इत्यादी मागणीसाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सर्वानुमती निर्णय घेतो की आमचे गाव, आमची गुरे, ढोरे, शेत जमीन विक्री आहे. तरी सरकारने दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करायला ही विनंती.
असे गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून मुख्यमंत्र्याकडे वेदना मांडल्या आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही अनेक आंदोलन झाली. आश्वासन देऊनही मदतीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. त्याचबरोबर पिक विमा कंपन्या सुद्धा उंटावरून शेळ्या राखत असल्यामुळे पिक विमा पासून शेतकरी वंचित राहत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी सध्या सर्व स्तरातून मागणी करण्यात येत आहे.