भोर -जलाशयात बुडताना आणि बुडालेल्यांचा शोध घेऊन आनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम भोर मधील भोईराज तरुण मंडळाचे पट्टीचे जलतरण पट्टू वर्षानुवर्ष करीत आले आहेत. मात्र, आज अशा एका जलतरण पट्टू असलेल्या गणेशनगर (भोलावडे) येथील गणेश पांडुरंग तारु (वय 37, ता. भोर) यालाच पाण्यात बुडुन जीव गमवावा लागल्याची घटना भाटघर धरण जलाशय भागातील जोगवडी गावच्या हद्दीत घडली.
गणेश पांडुरंग तारु यांचा मच्छीमारीचा व्यवसाय असल्याने ते जोगवडी गावच्या हद्दीत सोमवारी (दि. 19) सायंकाळी मासेमारीसाठी जलाशयात जाळी टाकुन आले होते. ही जाळी काढण्यासाठी ते आज (दि.20) सकाळी सात वाजता जलाशयात पोहण्याच्या पेटाऱ्यासह पाण्यात उतरले, जाळी गोळा करीत असताना त्यांचे पाय जाळ्यात अडकल्याने ते पेटाऱ्यावरून उलटे खोल पाण्यात पडले. जवळपास कोणीही नसल्याने त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. या घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळताच पोलीस जमादार सुरेश आखाडे व पोलीस हवालदार एस. आर. दावलकर हे घटनास्थळी पोहोचले, त्यांनी पंचनामा करुन मयत गणेश तारु यांचा मृतदेह भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छदनासाठी पाठविला, त्यानंतर मृतदेह नातेहोईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत गणेश तारु हे गणेशनगर येथील श्री काळूबाई गणोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. गणेश यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, वडील, आई, एक भाऊ, दोन विवाहित बहिणी, असा परिवार आहे.