नवी दिल्ली – करोना लसीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना संबोधित केले. यावेळी संशोधकांवर विश्वास व्यक्त करताना पुढच्या काही आठवड्यात देशात करोनाची लस तयार झाली असेल असे त्यांनी नमूद केले.
लस नागरिकांपर्यंत पाहोचवण्याची योजनाही तयार करण्यात आली असून आता तिच्या दराबाबत संदर्भात राज्यांच्या सरकारांशी चर्चा सुरू असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सार्वजनिक आरोग्य सेवा डोळ्यासमोर ठेवून लसीचे मूल्य निर्धारित केले जाईल व यात राज्यांची भूमिका महत्वाची असणार आहे, असे ते म्हणाले.
बैठकीत सहभागी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, करोनाची लस तयार करण्यात आपल्याला पूर्ण यश मिळेल असा विश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आहे. त्याला आता फार वेळ लागणार नाही आणि येत्या काही आठवड्यांतच लस तयार झालेली असेल असे तज्ञांना वाटते आहे. त्यांच्याकडून एकदा हिरवा झेंडा दाखवला गेला की, लगेचच लसीकरणाची मोहिम सुरू केली जाईल.
किमतीबद्दल बोलायचे म्हटले तर लोकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाइल. आज संपूर्ण जगाचे लक्ष कमी किमतीच्या सुरक्षित लसीकडे आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की सगळ्या जगाचे भारताकडेच लक्ष आहे.
दरम्यान, बैठकीत वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींनी काही सूचना मांडल्या तर पंतप्रधानांनी काही पक्षांच्या पंतप्रधानांना लेखी स्वरूपात आपल्या सूचना देण्यास सांगितले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, बऱ्याच वेळा अफवा पसरतात. त्या जनहित आणि राष्ट्रहिताच्या विरोधात असतात. अशा वेळी योग्य जागरूकता निर्माण करणे आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की आज भारतात सगळ्यांत जास्त चाचण्या होत आहेत.
आपला रिकव्हरी रेट चांगला असून बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. ज्या प्रकारे आपण करोनाच्या विरोधातला लढा लढला आहे, त्यावरून प्रत्येक देशवासियाची दुर्दम्य इच्छाशक्तीच त्यातून प्रतित होते आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भितीचे आणि संशयाचे वातावरण होते.
मात्र आज डिसेंबरमध्ये विश्वास आणि आशेचे वातावरण आहे. या काळात बरीच मोठी मजल आपण मारली आहे. आता आपण लस प्राप्त करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अशा वेळी तीच समज, जागरूकता, जनभागिदारी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.