नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या यशाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले असून त्यांनी म्हटले आहे की, उद्दामपणा, पैशाची मस्ती आणि जय श्रीरामचा राजकारणासाठी केलेला वापर हा भाजपला भोवला आहे. समाजात भेदभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि निवडणूक आयोगाचाही तेथे पराभव झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या सगळ्या शक्तींच्या विरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या आणि त्या जिंकल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी ममतांचे कौतुक केले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनाही ममतांचे या आधीच अभिनंदन केले आहे. काल एका दूरचित्रवाणी वाहिनीवर ममतांच्या विजयाबद्दल आणि कॉंग्रेसच्या पश्चिम बंगालच्या पराभवाबद्दल बोलताना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आमची तेथे एक स्ट्रटेजी होती असे सूचक वक्तव्य केले आहे. तथापि त्यावर त्यांनी अधिक भाष्य केले नाही.