पिंपरी ग्रामस्थांकडून जीव धोक्यात घालून प्रवास
गावातील ओढ्याला पाणी वाढल्याने गैरसोय
साकव पुलाची नागरिकांतून मागणी
भुलेश्वर (वार्ताहर) –पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपरी ओढ्यांवर जादा पाणी वाहत असल्याने लिंबोरे वस्ती व वाकवस्ती येथील ग्रामस्थांना हा ओढा ओलांडताना चक्क दोरीचा वापर करून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यामुळे या ठिकाणी साकव पुलाची मागणी पिंपरी गावच्या सरपंच मिना शेंडकर यांनी केली आहे.
पिंपरी येथील ओढ्याचा उगम आंबळे येथील ढवळेश्वर येथुन झाला असुन आंबळे, दरेकर मळा, पिसर्वे, मावडी, पिंपरी, मार्गे हा ओढा शेवगाई पाझर तलाव ते पांडेश्वर येथे कऱ्हा नदीला मिळतो. अनेक गावातील ओढ्यावरील सिमेंट बंधारे, पाझर तलाव, भरल्यामुळे हा ओढा आजही दुथडी भरून वाहात आहे. त्यामुळे पिंपरी येथील लिंभोरे वस्ती, वाकवस्ती येथे लोकांना ये -जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असुन अक्षरश: महिला दोरीचा वापर करून ये जा करावी लागते. पाण्याचा प्रवाह जादा असल्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते. तरी वरील ओढ्यावर वाकवस्ती व लिभोंरे वस्ती या ठिकाणी साकव करण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.
साकव करण्याची मागणी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. परंतु, अद्याप निधी मंजुर झालेला नाही. ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा.
– मिना शेंडकर, सरपंच, पिंपरी