नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारने एक महिन्यापूर्वी फेम 2 योजना लागू केली आहे. त्याचबरोबर या अगोदरही अशी योजना लागू केली होती. या कारणामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहन वापराबाबत सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ लागली आहेत. त्यामुळे 2030 व्या वर्षांपर्यंत भारतातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने असतील असे नीती आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, 2030 पर्यंत भारतातील एकूण दुचाकीच्या 80 टक्के एवढ्या दुचाकी इलेक्ट्रिक असतील. त्याचबरोबर तीस टक्के इतक्या कार इलेक्ट्रिक असण्याची शक्यता आहे.
भारताने उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना बऱ्याच सवलती फेम 2 ह्या योजनेअंतर्गत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वाहनांची संख्या वाढेल. 2030 पर्यंत देशातील 70 टक्के व्यवसायिक वाहने इलेक्ट्रिक असतील,40% बस इलेक्ट्रिक असतील असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यामुळे भारताची तेलाची आयात वेगाने कमी होणार आहे.