नवी दिल्ली: करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टाळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये इंधनाचा वापर नसलेल्या वाहनांना चालना देण्याचा प्रयत्न करावा, असे शहर व्यवहार आणि गृहनिर्माण मंत्रालयाने राज्य सरकारला सुचविले आहे.
करोनानंतर न्यूयॉर्क या शहरांमध्ये सायकलने प्रवास करण्याला चालना दिली जात आहे. रस्त्यावरून सायकलवरून जाणाऱ्यांना मार्ग उपलब्ध करून दिल्यानंतर सायकल वापरास चालना मिळू शकेल. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी कॅशलेस तंत्रज्ञान वापरावे, असे सांगण्यात आले आहे. सर्व शहरांमध्ये सायकल वापरणाऱ्यांची सेय असणारे वातावरण निर्माण केले तर यामुळे इंधनाची बचत होऊ शकेल. त्याचबरोबर नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
ही बाब पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही चांगली आहे, या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. शहरांमध्ये नागरिक कार्यस्थळापासून जास्त दूर राहात नाही. त्यासाठी मोटारीचा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याऐवजी सायकल सारख्या वाहतूक साधनाचा वापर करता येऊ शकतो.
भारतात 18 शहरामध्ये 700 किलोमीटर मेट्रो रेल्वे आहे. त्याचबरोबर 11 शहरांमध्ये 450 किलोमीटरचा वेगवान बस वाहतुकीचा मार्ग आहे. मात्र या काळात या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सायकलच्या वापराला चालना दिली जाऊ शकते.