थेऊर – महसूल विभाग, पाटबंधारे विभाग व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे उरूळी देवाची (ता. हवेली) येथील पाण्याचा बंधारा सुरक्षित राहिला आहे. बंधाऱ्याची गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे. अतिवृष्टीमुळे अतिरिक्त पाण्याचा स्रोत अन्य ठिकाणाहून काढून दिल्यामुळे धोका टळला. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
भाडळे वस्तीवरील बंधारा पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होता. त्यातच बंधाऱ्याला काही ठिकाणी गळती सुरू झाली. पावसाचे थैमान सुरूच राहिल्याने बंधारा फुटण्याच्या मार्गावर असल्याची कल्पना आल्याने ग्रामस्थांनी ही बाब महसूल व पाटबंधारे विभागास कळवली. दरम्यानच्या काळात अफवांचे काहूर माजल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली. हवेलीचे महसूल नायब तहसीलदार संजय भोसले, पाटबंधारे विभागाचे बोरकर व त्यांचे पथक, मंडलाधिकारी व्यंकटेश चिरूमुल्ला, तलाठी श्रीकृष्ण शिरसाट, गणेश सुतार, कोतवाल संतोष कुटे, सुरेश तंगाडे, रवी घुले यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन परिस्थितीची पाहणी केली. ताबडतोब जेसीबीच्या सहाय्याने खडकावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला बंधाऱ्याचा बाजूने वाट काढून दिली. त्यामुळे प्रशासनास बंधाऱ्याची गळती थांबवण्यात यश मिळाले.
बंधाऱ्याच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा लोंढा काही प्रमाणात थांबवल्याने येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रशासनाचे पथक रात्रदिवस तळ ठोकून होते. त्यामुळे बंधारा पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.