बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केल्यामुळे राजकारणातील हा महत्त्वाचा चेहरा निवृत्ती घेत आहे की काय, अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत.
भारतीय राजकारणामध्ये पक्षाचा विचार न करता केवळ चेहरा समोर ठेवून त्या चेहऱ्याला महत्त्व देऊन जे मतदार त्या चेहऱ्याला सत्तेपर्यंत पोहोचवतात अशा काही निवडक चेहऱ्यांमध्ये नितीशकुमार यांचा समावेश होतो. आपल्या दीर्घराजकारणामध्ये त्यांनी अनेकविध पक्षांशी जरी युती केली असली, तरी त्यांच्या सत्ताकारणावर त्याचा कोणताही फरक पडला नव्हता. नरेंद्र मोदी यांच्या नावाप्रमाणेच नितीशकुमार यांच्या नावाचाही ब्रॅंड बिहारमध्ये तयार झाला आहे. म्हणूनच गेली अनेक वर्षे नितीशकुमार मुख्यमंत्री या पदावर कार्यरत असून बिहारचा कारभार पाहात आहेत. पण तरीही राजधानी पाटणामध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीशकुमार यांनी स्पष्टपणे आगामी निवडणुकांमध्ये तेजस्वी यादवच नेतृत्व करतील, अशी घोषणा केल्यामुळे नितीशकुमार राजकारणातून निवृत्ती घेत आहेत की काय अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.
आगामी निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालीच लढा दिला जाईल, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. याच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तेजस्वी यादव यांनीही नितीशकुमार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले असले तरी नितीशकुमार यांच्या या संकेतामुळे ते निश्चित सुखावले होते. बिहारमधील सर्वात महत्त्वाचे नेते असलेल्या
लालूप्रसाद यादव यांच्या विचारांचा आणि कुटुंबाचा वारसा लाभलेल्या तेजस्वी यादव यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहेत, हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये सिद्ध झाले आहे. बिहारला तेजस्वी यादव यांच्या निमित्ताने एक चांगला नेतृत्वाचा चेहरा निश्चितच मिळू शकतो. बिहारमधील विधानसभा निवडणूक नेहमीच जातीपातीच्या गणितावर लढवली जात असल्याने आणि बिहारमध्ये यादव मतदारांचाच प्रभाव जास्त असल्याने नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांचे नेतृत्व मान्य केल्यानंतर त्याचा राजकीय फायदा निश्चितच राष्ट्रीय जनता दलाला होणार आहे. यानिमित्ताने नितीशकुमार यांनी नेतृत्वाच्या शर्यतीतून माघार घेतली असली, तरी त्याचवेळी ते ज्या पक्षाचे काम करतात त्या जनता दल युनायटेडचे काय होणार, याचाही विचार करावा लागणार आहे.
एकेकाळी केंद्रात सत्तेवर असलेल्या जनता दलाचे अनेक तुकडे झाल्यानंतर जनता दल युनायटेड आणि जनता दल सेक्युलर हे दोन तुकडे फक्त बिहार आणि कर्नाटक या राज्यांमध्येच अस्तित्वात आहेत. आता नितीशकुमार यांनी आपण मुख्यमंत्री होणार नाही, असे संकेत दिल्यानंतर बिहारमध्ये तरी जनता दल युनायटेडचे अस्तित्व राहील की नाही याबाबत शंका घ्यायला जागा आहे. जनता दल युनायटेड असो किंवा राष्ट्रीय जनता दल असो हे सर्व मूळ जनता पक्षाचे तुकडे असल्यामुळे त्यांची विचारधारा समान आहे. भाजपचा राज्यात आणि केंद्रात पराभव करण्याच्या समान उद्देशामुळेच हे सर्व पक्ष काम करत आहेत.
या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांच्या संकेताचे मूल्यमापन करावे लागणार आहे. नितीशकुमार यांनी यापूर्वी भाजपशी घरोबा केला असला तरी आणि भाजपच्या साथीने केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगली असली, तरी गेल्या काही कालावधीपासून त्यांनी जाणीवपूर्वक भाजपपासून अंतर राखले आहे. म्हणूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बरोबर युती करून सत्ता स्थापन झाल्यावरही त्यांनी नंतर भाजपशी काडीमोड घेऊन तेजस्वी यादव यांच्याशी युती करून नव्याने सरकार स्थापन केले होते. याच धोरणाचा पुढील भाग म्हणून त्यांनी आता आगामी कालावधीतील निवडणुकीतील नेतृत्वाची धुरा तेजस्वी यादव यांच्यावर सोपवली आहे. बिहारच्या राजकारणात नव्हे तर राष्ट्रीय राजकारणामध्येसुद्धा लालूप्रसाद यादव यांच्याप्रमाणेच तेजस्वी यादव यांची चर्चा आहे. त्यांच्या कामाची पद्धत असो किंवा त्यांची वक्तृत्व शैली असो ते लोकांना प्रभावित करण्याचे काम करत असतात.
बिहारच्या सत्ताकारणाची सूत्रे जर तेजस्वी यादव यांच्या हातात दिली, तर निश्चितच भाजपासाठी एक मोठे आव्हान उभे राहील. याची कल्पना नितीशकुमार यांना असल्यानेच त्यांनी हे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी बिहारमधून जास्तीत जास्त खासदार लोकसभेत जाण्याची गरज असते. बिहारने भाजपाला चांगली साथ दिली आहे; पण आता या बदलत्या समीकरणानंतर बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीतही भाजपला तेजस्वी यादव आणि नितीशकुमार यांचे आव्हान पेलावे लागणार आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहारच्या राजकारणाचे नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे सुपूर्द करताना नितीशकुमार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, हेही स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांचे एका एकमुखी नेतृत्वावर एकमत होत नसल्याने नितीशकुमार या विषयातून बाजूला झाले असावेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यांनी आणि त्यांच्या पक्षाने दीर्घकाळ राज्य केले होते. आता नितीशकुमार यांच्या या नवीन संकेतामुळे लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव हेसुद्धा बिहारमध्ये दीर्घकाळ राज्य करतील अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे बिहारचे राजकारण निश्चितच रंगतदार होणार आहे.