संयुक्त राष्ट्र – बौद्ध, हिंदू आणि शीख धर्मियांवर होत असलेल्या द्वेषमूलक आणि हिंसाचाराच्या घटनांची संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडून दखल घेतली जात नाही, अशी टीका भारताने केली आणि शांती संस्कृती केवळ अब्राहमिक धर्मासाठीच असू शकत नाही हे अधोरेखित केले. आज जगात निराशावादी प्रथा पसरत असल्याची टीकाही संयुक्त राष्ट्रामधील भारताचे कायम दूतावासाचे प्रथम सचिव आशीष शर्मा यांनी बुधवारी ‘शांतीची संस्कृती’ या विषयावर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अधिवेशनाला संबोधित करताना केली.
धर्मविरोधी, इस्लाम फोबिया आणि ख्रिश्चनविरोधी कृत्याचा निषेध करण्याची आवश्यकता आहे, याबाबत भारत संपूर्णपणे सहमत आहे. अशा कृत्यांचा भारताकडून ठामपणे निषेधच केला जातो आहे. मात्र संयुक्त राष्ट्राच्या ठरावामध्ये केवळ या तीन अब्राहमिक धर्मांचीच चर्चा होते. मात्र बौद्ध, हिंदू आणि शीख धर्मांबाबत द्वेष पसरवला जाणे आणि हिंसेच्या वाढत्या प्रकरणांकडे या व्यासपिठाकडून दुर्लक्ष होते, असेही ते म्हणाले.
शांतीची संस्कृती केवळ अब्राहम धर्मासाठी असू शकत नाही आणि जोपर्यंत असे निवडक धोरण अस्तित्वात आहे तोपर्यंत जगात खरोखर शांतीची संस्कृती रूजू शकत नाही. धर्माच्या मुद्दयावर संयुक्त राष्ट्राकडून कोणतीही एक बाजू घेता कामा नये. जर आपण खरोखर निवडक राहिलो तर अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ सॅम्युएल हंटिंग्टनच्या ‘संस्कृतींचा संघर्ष’ हा सिद्धांत सिद्ध करतच जग संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.
अफगाणिस्तानमध्ये बामियां बुद्धमूर्ती उद्ध्वस्त केल्या गेल्या. मार्चमध्ये गुरुद्वारामध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात 25 शीख भाविक मारले गेले आणि हिंदू, बौद्ध मंदिरांचा नाश आणि या धर्मांच्या अल्पसंख्याकांविरोधात वांशिक हिंसाचार केला जात असल्याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले आणि बौद्ध, शीख आणि हिंदूंवरील आत्याचाराची दखलही संयुक्त राष्ट्राने घ्यायला हवी आणि अशा कृत्यांचा निषेध करायला हवा, मात्र सध्याचे सदस्य देश जितक्या उच्च रवाने अब्राह्मिक धर्मावरील आत्याचाराबाबत बोलतात, तसे या धर्मांबाबतच्या अत्याचारांबाबत बोलत नाही. हा पक्षपातीपणा कशासाठी ? असा प्रश्न शर्मा यांनी उपस्थित केला.
भारतात सर्वच धर्मांचे अनुयायी…
संयुक्त राष्ट्राने जगभरतील धर्मविरोधी, इस्लामफोबिया आणि ख्रिश्चनफोबियाच्या घटनांविरोधात निषेधाचा ठराव केला आहे. मात्र जगभरात 1.2 अब्ज हिंदू आहेत. 535 दशलक्ष बौद्ध आहेत आणि सुमारे 30 दशलक्ष शीख आहेत. संयुक्त राष्ट्राने अब्राहमिक धर्मांवरील केलेल्या ठरावाच्या वेळी या तिन्ही धर्मांवरही हल्ले झाले होते, याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले. भारत फक्त हिंदू धर्म, बौद्ध, जैन आणि शीख धर्मांचे जन्मस्थान नाही, तर येथे इस्लाम, यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लामची सुफी परंपराही विकसित झाली आहे. भारतात झोरोस्टेरियन धर्माची शिकवणूकही वाढली आहे. जगभरातील सर्व प्रमुख धर्मांचे अनुयायी भारतात आहेत. परदेशांमध्ये छळ झालेल्यांना भारताने आश्रय दिला आहे याचीही शर्मा यांनी आठवण करून दिली.