ठाणे – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कामगार कायद्याविरोधात सर्व कामगार संघटना संयुक्तपणे आंदोलन करणार असल्याचे हिंद मजदूर सभेच्या महाराष्ट्र शाखेने म्हटले आहे. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाविरोधात सर्व कामगार संघटना संघटितपणे आंदोलन करणार असल्याचे हिंदू मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी सांगितले.
सरकारने कंपन्या बंद करणे अधिक सुलभ केले आहे. त्याचबरोबर ज्या कंपनीत तीनशेपेक्षा कमी कामगार आहेत अशा कंपनीतील कामगारांना काढून टाकण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. केंद्र सरकारने कामगारांचे हितरक्षण करणारे 44 कायदे बदलले आहेत. याविरोधात हिंद मजदूर सभेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिले आहे.
भारताला मॅन्युफॅक्चरिंग केंद्र करायचे आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थितीप्रमाणे भारतात कामगार कायदे असण्याची गरज आहे. त्यामुळे कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यात आल्या असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.