नवी दिल्ली – केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी करोना नियंत्रणाच्या केजरीवाल सरकारच्या दिल्ली मॉडेलचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीत करोनातून बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के इतके असून अन्य राज्यांनी दिल्ली सरकारच्या या मॉडेलचे अनुकरण केले पाहिजे.
मात्र, त्यांनी दिल्लीतील स्थिती चांगली असल्याचे म्हटले असले तरी केजरीवाल सरकारचा मात्र उल्लेख त्यांनी टाळला. ते म्हणाले की, दिल्ली ही केंद्रशासित प्रदेश असून तेथील स्थितीचे मॉनिटरिंग मी स्वतःही करीत आहे.
हैदराबाद येथील तेलंगणा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. करोनाचे रुग्ण बरे होण्याची देशाची सरासरी 64 टक्के इतकी असली तरी दिल्लीत ती 84 टक्के इतकी आहे हा एक चांगला दर आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यासाठी दिल्लीत जी उपाययोजना केली गेली आहे त्याचे अन्य राज्यांनीही अनुकरण केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.