सविंदणे – जांबुत (ता.शिरूर) येथील जोरीलवण वस्ती येथे रविवारी रात्री बिबट्याने दोन वर्षाच्या समृद्धी या मुलीवर हल्ला करीत अंगणातून उचलून नेले. त्यानंतर या भागातील सर्व ग्रामस्थांनी त्या मुलीची शोधाशोध केली. साधारण दोन तास शोधशोध केल्याने त्या मुलीचा मृतदेह सापडला.
समृद्धी योगेश जोरी असे या मुलीचे नाव असून या चिमुकलीवरती बिबट्यांने हल्ला करून ठार करण्यांची दुःखद घटना घडल्याने या भागातील हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी आठ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. घटनास्थळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकरचे संचालक प्रदीपदादा वळसे पाटील, सरपंच दामुशेठ घोडे, डॉ. जयश्री जगताप यांच्यासह मोठया प्रमाणात ग्रामस्थ जमले होते.
या घटनेला वनविभाग जबाबदार असुन वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगुन सुद्धा कोणतीही उपाय योजना केली जात नाही. त्यामुळे परीसरात तीन ते चार लोकांना बिबटयाच्या हल्यात जीव गमवावा लागला आहे.
वन खाते सामान्य लोकाना त्रास देणारे खाते झाले असल्याचे सांगत माजी आमदार पोपटराव गावडे साहेब व भिमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना आक्रमक होत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची सूचना दिली.
बेट भागात बिबटयांचा धुमाकळ उपाययोजना करावी. अशा आशयाच्या बातम्या प्रभातने प्रसिद्ध करून वेळोवेळी आवाज उठवला होता. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परासरीत नागरीकांनी बऱ्याचदा फोन करुनही वनविभाग पिंजरा उपलब्ध करून देत नाही. फोन करणाऱ्यांनाच तुमची गाडी पाठवा. व नेण्यासाठी माणसे उपलब्ध करा. पिंजऱ्यामध्ये सावज उपलब्ध करा, असे सांगत असतात. वास्तविक पाहता पिंजरे नेण्या-आणण्याचा लाखो रुपये खर्च वनविभागाकडून दाखवला जातो.