प्रा. डी. के. वैद्य
अकोले – महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या कळसूबाई शिखरावर आता दुचाकी वाहने जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गड किल्ले प्रेमींना ही सुखद बाब ठरणार आहे. भंडारदऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी हाताला फोड येईपर्यंत हे रस्ता करण्याचे काम करत आपली मोहीम यशस्वी केली. त्यामुळे त्यांच्या घामाचे दाम हे अनमोल ठरणार आहे हे निश्चित.
अकोले तालुक्यातील कळसूबाईचे शिखर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजले जाते. समुद्र सपाटीपासून 1 हजार 646 मीटर इतकी कळसूबाई शिखराची उंची आहे. हे शिखर चढून जाण्यासाठी अनेकांचे स्वप्न राहते. पण ते साकार करण्यासाठी होणारी दमछाक ही शब्दातीत राहते. त्यामुळे या स्वप्नपूर्तीसाठी भंडारदऱ्यातील कला व व वाणिज्य महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली कल्पकता अमूल्य ठरली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक हिवाळी शिबिरात विद्यार्थी एखाद्या खेड्यात जाऊन तेथील समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु याला अपवाद ठरले आहे ते भंडारदऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी. या कॉलेजच्या शिक्षकांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प आयोजित करताना इतरांसमोर वेगळा आदर्श मॉडेल ठेवण्याचे काम केले आहे. त्यासाठी त्यांनी बारी गावातील कळसूबाई या अति उंच शिखराची निवड केली. गावापासून माचीपर्यंत पर्यटक तसेच भाविकांना कमीत कमी दुचाकीवर जाणे शक्य कसे होईल? याचा विचार केला आणि रासेयो शिबिर बारी गावात आयोजित केले.
या शिबिरात मुले व मुली धरुन 50 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सात दिवसातील या शिबिरामध्ये दररोज 100 मीटर रस्ता या विद्यार्थ्यांनी बनविला. तसेच बारी गावात मोठमोठे पावसामुळे खड्डे पडलेले होते. या खड्ड्यामुळे पर्यटकांना त्रास होत होता. तेही एका दिवसात विद्यार्थ्यांनी बुजविले. गावातील संपूर्ण कचरा एकत्र करत तो नष्ट करण्यात आला. कळसूबाईच्या मध्यापर्यंत म्हणजेच माचीपर्यंत दुचाकी वाहने जाण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याने पर्यटकांची चांगलीच सोय झाली आहे.
अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य सुनील मालुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एकनाथ मुकणे, प्रा. दीपक वाकचौरे, संतोष आवारी, ललिता घोडके, श्वेताली देशमुख, भाऊराव भागडे, मीनाक्षी भागडे, मनोहर भांगरे, संतोष अस्वले यांनी या शिबिरासाठी विशेष सहकार्य करत महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवर कमीत कमी मध्यापर्यंत का होईना जाणारा रस्ता तयार केला. भविष्यात असेच उपक्रम राबवत रस्ता आणखी वरपर्यंत नेणार, असे विद्यालयाचे शिक्षक भाऊराव भागडे यांनी व्यक्त केली.