मुंबई – एकतर्फी प्रेमातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरूणीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये जळीतकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेवर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
अनिल देशमुख म्हणाले कि, त्या (आरोपी) दोघांचे संबंध होते, असे मी ऐकले आहे. त्यातून दोघांचे भांडण झाले. यातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. असे वक्तव्य त्यांनी केले. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातील ही घटना आहे. घरात घुसून एका महिलेवर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये पीडित महिला 95 टक्के भाजली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक केली आहे. आरोपी गावात राहणारा असून संतोष मोहिते असे त्याचे नाव आहे. आरोपी संतोष मोहिते हा गावात बिअर बार चालवतो. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.