मुंबई – राज्यात करोनाचा संसर्ग कायम असल्याने अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेले पावसाळी अधिवेशन अखेर पुढील महिन्यात निश्चित करण्यात आले आहे. विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेनशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवस होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकांमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची “आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
कोविड चाचणी निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल. इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चर्चेदरम्यान अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयके घेण्यात येणार आहेत.