कुरकुंभ – नगर-बारामती महामार्गावर जिरेगाव हद्दीत बऱ्याच दिवसांपासून हा रस्ता खोदून ठेवलेल्या अवस्थेत आहे. त्यात मागील आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखलाची घसरगुंडी झाली होती. याबाबत दैनिक “प्रभात’ने गुरुवारी (दि. 1) वृत्त देखील प्रसिद्ध केले होते. याच रस्त्यावर शनिवारी (दि. 3) पहाटेच्या सुमारास कुरकुंभ (ता. दौंड) बाजूने बारामतीकडे जात असताना ट्रक रस्त्यावर उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चालक थोडक्यात बचावला.
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अहमदनगर ते बारामती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून, हा मार्ग कुरकुंभ, जिरेगाव भागातून जातो. या मार्गावरील काही भागात कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी जिरेगाव भागात मात्र हा रस्ता खोदलेल्या अवस्थेतच आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
या संबधीचे वृत्त दैनिक “प्रभात’ने वेळोवेळी प्रसिद्ध देखील केले होते. मात्र, संबधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. ऐन पावसाळ्यात अर्धवट कामामुळे प्रवाशांना, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना या अर्धवट रस्त्याचा सामना करावा लागत असून, हा रस्ता जीव घेणारा ठरत असल्याने आज झालेल्या अपघाताने तरी संबंधित विभाग जागे होईल का, असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत.
नगर-बारामती रस्त्यावरील जिरेगाव हद्दीत रस्त्याचे काम बंद असल्याने रस्ता खोदून ठेवलेल्या अवस्थेत आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. आज (दि. 3) पहाटे घडलेल्या अपघाताची संबधित विभागाने दखल घेऊनअर्धवट राहिलेला रस्ता पूर्ण करावा.
– भरत खोमणे, सरपंच, जिरेगाव