नगर – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी (दि.22) रात्री नागरिकांच्या घरांना हादरा बसल्याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भूकंपमापन केंद्राच्या अधिकाऱ्यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाली नाही, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे भूकंपाचा धक्का कधीही बसू शकतो असे गृहीत धरून सतत दक्षता घ्यावी. घराची नियमित पाहणी करून दुरुस्ती करणे जरुरीचे आहे. भिंतींना तडे गेले असतील तर ते दुरुस्त करणे व भिंतींची मजबूती करणे आवश्यक आहे. घरातील, कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक इमारतींमधील सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग जाणून व समजून घ्या. अवजड आणि मोठया वस्तू शक्यतो जमिनीलगत ठेवा, उंच जागेवर ठेऊ नका. घरातील कपाटे, अवजड फ्रेम्स भिंतीवर व्यवस्थित लावाव्यात.
भूकंपा दरम्यान काय करावे ?
स्वत: शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. जर तुम्ही घरात, इमारतीच्या आत असाल, टेबलाखाली अथवा पलंगाखाली बसून स्वत:चा बचाव करा. कॉलमजवळ, दरवाज्याजवळ, चौकटीखाली उभे राहुन स्वत:चा बचाव करा. लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. भिंती, आरसे, फर्निचर, कंदील यांचेपासून लांब रहा. शक्यतो चादर, उशी अथवा कपडयाची घडी डोक्यावर घ्या, जेणेकरुन इजा होणार नाही. रस्त्याच्या कडेने जात असाल तर उंच जुन्या आणि सलग असणाऱ्या इमारतीपासून लांब रहा. भिंती, वीजेच्या तारा आणि अंगावर पडण्याची शक्यता असेल अशा वस्तूंपासून दूर रहा.
भूकंपानंतर काय करावे
शांत रहा, रेडीओ, टिव्हीद्वारे मिळणाऱ्या सूचना काळजीपूर्वक ऐका व त्यांचे पालन करा. भूकंपानंतर अनेक अफवा उठतात. अफवांवर विश्वास ठेऊ नका. अफवा पसरवू नका. भुकंपाच्या मुख्य धक्क्यानंतर छोटे धक्के बसू शकतात. त्यामुळे पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा. काडी ओढू नका. विजेचे बटन लगेचच चालू करु नका, कारण गॅस गळती अथवा शॉर्टसर्कीट होण्याची शक्यता असते.