2 आंदोलकांना केली अटक ः आरे कॉलनीत जमावबंदी, रस्ते बंद
मुंबई- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरे कारशेडमध्ये रात्रीतून वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तरी, आरेतील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी 29 आंदोलकांना अटक करत कारवाई केली. यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून आरे कॉलनीत जमावबंदी करण्यात आली आहे. तसेच या परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.
आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर प्रशासनाकडून आरे परिसरातील झाडे तोड करण्यास सुरूवात करण्यात आली.
स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत याठिकाणच्या तब्बल 400 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास आरे कारशेडच्या ठिकाणी झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर काहीच वेळात पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी प्रशासनाचे काम बंद पाडले.
याठिकाणी पर्यावरण प्रेमींचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता पोलीस प्रशासनाने अधिकची कुमक मागवली आणि पर्यावरणप्रेमींची धरपकड केली. पोलिसांनी यावेळी काही जणांना ताब्यात घेतले आणि मारहाण देखील केली. दरम्यान पर्यावरण प्रेमी आणि आंदोलकांनी रात्रभर याठिकाणी आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी चिघळणारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पथक देखील मागवले होते.
दरम्यान, आरेतील वृक्षतोडीनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या वृक्षतोडीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी विरोध केला आहे. तसेच विकासासाठी जैवविविधतेला संपवणे लज्जास्पद असल्याचे म्हणत वृक्षतोडीविरोधात आंदोलकांना पाठिंबा दर्शवला आहे.
सगळं अट्टाहास आरेमध्ये का? ही झाडे कापून मुंबईच्या प्रदूषणात वाढ होणार आहे. पुढच्या पिढीचे भविष्य प्रदूषणाच्या विळख्यात आहे. आरेला विरोध करणारे आणि आरेतील जंगल तोडणारे काल एकत्र झाले, अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
तर अंधारात काळे कारनामे करणारे गुन्हेगार असतात आणि या सरकारी गुन्हेगारांना जनतेच्या न्यायालयात शासन होणे आवश्यक आहे. जाहीर निषेध!, अशा शब्दात कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला.