मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी दिलेल्या नावांवरून बराच वाद उभा राहिला. निष्ठावंतांना डावलून भाजपानं उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ चांगलेच दुखावले आहेत. त्यावरून पक्ष आणि खडसे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचेही पहायला मिळाले. मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय नितीन गडकरी यांनी अखेर मौन सोडले आहे. गडकरी यांनी खडसे यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली.
विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे इच्छुक होते. तशी इच्छा त्यांनी पक्षाकडे बोलून दाखवली होती. त्याचबरोबर विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर पाठवले जाईल, असेही बोलले जात होते. मात्र, भाजपाने सगळ्यांनाच धक्का दिला. उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर खडसे यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. या सगळ्या वादावर नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र काम केले आहे. पक्षाचा विस्तार करण्यात खडसे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अतिशय प्रतिकूल काळात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात त्यांनी मोठं काम केले. पक्षाला यश मिळवून दिले. मात्र आज त्यांना दिली जाणारी वागणूक दुःखद आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून इतकी वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर वा नेत्यावर ही वेळ येणं पक्षासाठी चांगले नाही. त्याबद्दल मी फक्त दुःख व्यक्त करू शकतो, त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही, अशा शब्दात गडकरी यांनी आपली खंत व्यक्त केली.