लोणी काळभोर (पुणे) – येथील ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलने प्रचारात विजयी आघाडी घेतली आहे. गावचा विकास हाच आमचा ध्यास आहे, त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन पॅनल नक्कीच विजयी होईल, असा विश्वास पॅनल प्रमुख ज्येष्ठ नेते माधव काळभोर यांनी व्यक्त केला आहे.
हवेली तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक (दि. 15) जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते माधव काळभोर यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काळभोर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर यांच्या सहकार्याने परिवर्तन पॅनेल उभे केले आहे.
पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाला नारळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर मंदिरासमोर एक सभा पार पडली. या पूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्व पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मंदिरात करण्याची परंपरा आहे. परंतु यावेळी मतदारांचा प्रतिसाद जोरदार असल्यामुळे नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये जर विकासाचा दृष्टीकोन असेल तर गावचा विकास वेगाने होतो. त्यामुळे परिवर्तन पॅनलमध्ये तरूण, अनुभवी, अभ्यासू व विकासाचा दृष्टीकोन असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनलमधील उमेदवारांना गावातील समस्यांची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे हे उमेदवार गावाच्या विकासासाठी झोकून देऊन काम करणार आहेत. आगामी पाच वर्षांत गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा परिवर्तन पॅनेलचा मानस आहे.
यापूर्वीच्या काळात माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, माजी सरपंच भोलेनाथ शेलार, माजी उपसरपंच योगेश काळभोर या सर्वांनी पदावर असताना वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठा निधी आणून गावामध्ये विकासकामे केली आहेत. हे मतदारांनी पाहिले आहे. आगामी काळात मतदारांना विकास हवा आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनलच्या मागे मतदारांनी आपली खुप मोठी ताकद उभी केली आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत. लोणी काळभोर हे गाव पुणे शहरालगत असल्याने गावातील नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. गावाची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. त्या प्रमाणात सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून पुढे आणण्याचे सर्व नियोजन परिवर्तन पॅनलने केले आहे. ही बाब मतदारांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास यावेळी माधव काळभोर यांनी व्यक्त केला.